रेणा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडण्यास स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

Rena Medium Project, Renapur
Rena Medium Project, Renapur

रेणापूर (जि.लातूर) ः भंडारवाडी (ता.रेणापूर) येथील रेणा मध्यम प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी स्थगिती दिली. नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाणी पिण्यासाठी पुरेल असे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी दिले. संबंधित यंत्रणेने प्रकल्पातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचेही त्यांनी आदेशित केले.


घनसरगाव येथील काही शेतकऱ्यांनी पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी करून आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यावरून पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याची तयारी चालवली होती. हे लक्षात येताच रेणापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांच्या नेतृत्वात नगरसेवक आणि रेणापूरसह परिसरातील गावच्या नागरिकांनी मागच्या तीन दिवसांपासून रेणा प्रकल्पाच्या दरवाजासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी तहसीलदारांसह पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत माघार घेण्याची विनंती केली होती. परंतु ग्रामस्थांनी ती फेटाळत आंदोलन सुरूच ठेवले होते. या प्रश्नामुळे रेणा प्रकल्पाच्या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रेणापूरकरांनी ही बाजारपेठ बंद ठेवत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. त्यामुळे शुक्रवारी (ता.२८) दुपारी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी आंदोलनकर्ते आणि पाणी सोडण्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संयुक्त बैठक लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावली होती. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. बैठकीला उपस्थित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उपलब्ध पाणीसाठ्याची माहितीही घेतली. जुलै अखेरचे नियोजन केले असता थोडेफार पाणी सोडता येईल असे मत अधिकाऱ्यांनी मांडले.


दरम्यानच्या काळात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा जिल्हाधिकाऱ्यां‍ना दूरध्वनी आला. यावेळी बोलताना आयुक्तांनी ऑक्टोबर अखेरपर्यंत पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे. शेतीऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. पर्यावरणातील बदलानुसार जुलैपर्यंत पाऊस पडत नाही. त्यामुळे ऑक्टोबरपर्यंत पाणी पुरेल याची काळजी घ्या ,असे ते म्हणाले. यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी पाटबंधारे विभागाला साठ्याची माहिती मागितली.

ऑक्टोबरपर्यंतचा विचार करता सध्या प्रकल्पातून पाणी सोडता येणार नाही, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. त्यामुळे आजघडीला भंडारवाडी प्रकल्पात उपलब्ध असणारा पाणीसाठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. याशिवाय महसूल व पाटबंधारे विभागाने प्रकल्पातून होणारी पाणीचोरी रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी या बैठकीत दिले. तीन दिवस केलेल्या आंदोलनानंतर आता भंडारवाडीतून पाणी सोडले जाणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आंदोलन मागे घेणार असल्याचे रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान तीन दिवस प्रकल्पाच्या दरवाजासमोर केलेल्या आंदोलनानंतर पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्यामुळे आंदोलनकर्त्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला. उपनगराध्यक्ष आकनगिरे यांच्यासह नगरसेवक आणि नागरिकांनी यावेळी भंडारवाडी प्रकल्पात जलपूजन केले.

रेणापूर नगरपंचायतीचे कौतुक
बैठकीत बोलताना तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाने पाण्याचे आरक्षण, थकीत वीजबिल व पाणीपट्टीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली. यावेळी रेणापूर नगरपंचायतीकडे कसलीही थकबाकी नसल्‍याचे स्‍पष्‍ट झाले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी रेणापूर नगरपंचायतीचे जाहीर कौतुक केले. पिण्यासाठी पाणी मिळणे हा रेणापूरकरांचा हक्क असल्याचे जिल्हाधिकारी यावेळी बोलताना म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com