‘लॉकडाऊन’मध्ये क्रांतिसूर्याचे ऑनलाइन कवी संमेलन

gokunda.jpg
gokunda.jpg


गोकुंदा, (ता.किनवट, जि. नांदेड) ः ‘कित्येक वर्षे उलटले तुला जाऊन, कित्येक हंगाम सरलेत
इथल्या माणसाच्या गर्दीत तुझी वाट पाहून..
कित्येक माणसे आली, गेलीत, संपलीत..
काळाच्या ओघात !
काही छापल्या गेलीत मोठ्या गलतीनं,
इथल्या चलनी नोटांवर..
काही उरलीत नेमकी मोजण्या इतकी बोटावर..
तू मात्र कायमच आहे आमच्या अनंत ओठावर..!"
करंटा कवी नामदेव...बोलला एव्हढा परफेक्ट महानायक कुठल्याच पुस्तकात आढळला नाही....


ही ‘परफेक्ट महानायक’ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर कविता सादर करून ऑनलाइन कवी संमेलनाचे अध्यक्ष प्रा. नंदू वानखडे (वाशीम) यांनी श्रोत्यांची वाहवा मिळविली. राष्ट्रपिता जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘क्रांतिसूर्य’ व्हॉट्सअॅप समूहाने ‘लॉकडाऊनमुळे’ ऑनलाइन कवी संमेलन घेण्यात आले. सुजाता पोपलवार (नांदेड), अर्चना खोबरागडे (यवतमाळ), संध्या रायठक (नांदेड), अरुण विघ्णे (आर्वी), रमेश बुरबुरे (यवतमाळ), प्रशांत ढोले (वर्धा), चंद्रकांत कदम (नांदेड) अभि. मनिष गवई (अमरावती) हे कवी - कवयित्री ऑनलाइन उपस्थित होते. प्रारंभी महाकवी वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे प्राचार्य सुरेश पाटील यांनी अभिवादन गीत गायले. स्तंभलेखक उत्तम कानिंदे यांनी प्रास्ताविक व क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचे रमेश मुनेश्वर यांनी सूत्रसंचालन केले. सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी आभार मानले. रुपेश मुनेश्वर यांनी तांत्रिक सहाय्य केले.


‘आज आपण अत्यंत संक्रमण काळात
वाटचाल करत आहोत..
शत्रू हळूहळू वेढा घालतोय आपल्याला..
मोक्याच्या व मानाच्या जागा, कधीच काबीज केल्या त्यांनी..
लोकशाहीचे सारेच स्तंभ पोखरलेत,
आपण मात्र गाफील बेसावध..!’ ही रचना सादर करून भारत लढे यांनी उद्‍घाटन केले.
कवियत्री सुजाता पोपलवार (नांदेड) यांनी महात्मा जोतिबा फुले यांच्या कार्यावर
‘हे क्रांतिसुर्या,
जीर्ण झालेल्या ग्रंथाच्या पानात,
माझे अस्तित्व आता चाळू कशाला..
तुझ्या फुलांच्या वाटेवरी चालताना,
काटेरी वाटेकडे आता वळू कशाला..? ही रचना सादर केली...
फुले-आंबेडकरी चळवळ माणसानं जगली पाहिजे म्हणून रमेश बुरबुरे (यवतमाळ) या कवीने चळवळीचे नाते सांगणारी गझल सादर करून दाद मिळविली..
‘खुश होता चेहरा पाहण्यासारखा,
बाप जळला तुझा कापरासारखा..
चळवळीशी निळ्या काय नाते तुझे ?
माय तू, तू तिला, वासरा सारखा..!’
कृतिशील जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई यांच्या जीवन कार्यालाच शब्दबद्ध करून कवयित्री अर्चना खोबरागडे (यवतमाळ) यांनी
बा क्रांतिबा, तुही तोडून आणू शकला असतास,
चंद्र-तारे सावित्रीसाठी..
पण देऊन दिला विद्येचा प्रकाश,
दिलं जगण्यास स्त्रियांना मुक्त आकाश..!
ही कविता सादर केली. कवी अरुण विघ्ने (वर्धा) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांच्या कार्याची प्रचिती देणारी रचना सादर करून टाळ्या मिळविल्या..


माणसाला माणसाशी जोडले भीमाने,
जातीभेदाची कवाडे तोडले भीमाने..
नागभूमीत बुद्धधम्म लोका देऊनी,
रमाईच्या वचनाला फेडले भीमाने...
नांदेड येथील गझलकार चंद्रकांत कदम यांनी न्याय देणारी रचना सादर केली..
प्रत्येक वाक्य माझे न्यायासमान आहे,
श्वासात भीम माझा मी संविधान आहे..
का जन्मभर करू मी हुजरेगिरी कुणाची
होऊन वाघ क्षणभर जगण्यात शान आहे..!
वर्धा येथील कवी प्रशांत ढोले यांनी अभंग रचना सादर केली..
शिक्षण घेऊन, जगाचे कल्याण
करावे आपण, आपलेही I
ज्ञान अनुभव, असावा पाठीशी लाऊ गोडी असी, शिक्षणाची...
कवी अभियंता मनिष गवई (अमरावती) आणि कवयित्री शिक्षिका संध्या रायठक (नांदेड) यांच्याही रचना अप्रतिम होत्या.. ऑनलाइन कार्यक्रमास क्रांतिसूर्य परिवारातील बहुसंख्य सभासद उपस्थित होते. कोरोनाच्या प्रकोपातील ‘लॉकडाऊन’मध्ये घरातल्या घरात राहून संपूर्ण महाराष्ट्रातील कवींना ऑनलाइन एकत्र आणून राष्ट्रनायकांची जयंती अनोख्या पद्धतीने साजरी केल्याबद्दल सर्वत्र आयोजकांची वाहवा होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com