उस्मानाबाद : शासनाने शहरासाठी १६८ कोटी रुपयांची भुयारी गटार योजना मंजूर केली असून निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आले. पुढील महिन्यात यातील कामांना सुरूवात होईल, असा विश्वास नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केला आहे. पालिकेतील अध्यक्षांच्या दालनात शनिवारी (ता. चार) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाणीपुरठा व स्वछता सभापती प्रदिप घोणे, नगरसेवकसोमनाथ गुरव यावेळी उपस्थित होते.
उजनी येथून पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर शहरात भुयारी गटार योजना केव्हा होणार? याकडे नागरिकांचे लक्ष होते. नाल्या, गटारे यांमुळे शहरात साथीच्या रोगांचे प्रमाण वाढते. यातून मार्ग काढण्यासाठी भुयारी गटार योजना प्रभावी ठरते. पालकमंत्री शंकरराव गडाख, माजीमंत्री तानाजीराव सावंत, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील तसेच मी स्वतः या कामासाठी नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. यातूनच हे साध्य झाल्यचे यावेळी नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यांनी सांगितले. भुयारी गटार योजनेसाठी १३ डिसेंबर २०१७ रोजी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी घेतली त्यानंतर २९ जून २०१९ रोजी तांत्रिक मंजुरी होऊन ११ मे २०२१ मध्ये याबाबतचा शासन निर्णय झाला आहे. सध्या निविदा प्रसिद्ध झालेली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात याची कामे सुरू होतील. असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अशी मिळते भुयारी गटार
अटल अमृत योजनेतून उजनी पाणीपुरवठा योजनेची कार्यक्षमता दुप्पट केली. त्यामुळे प्रतिव्यक्ती १३० लिटर प्रतिदिन पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. शासनाने भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव तयार करण्यास होकार दर्शवला. २२९ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली असून यातील १६८ कोटी रुपयांच्या कामास मंजुरी दिली आहे. शहराची विभागणी गोदावरी आणि कृष्णा दोन भागात होते. या दोन्ही खोऱ्याच्या मधून औरंगाबाद- सोलापूर बायपास राष्ट्रीय महामार्ग जातो. पहिल्या टप्प्यात कृष्णा खोऱ्याची म्हणजे रस्त्याच्या पश्चिम बाजूस लागणारा निधी मंजूर झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात उर्वरीत कामे होणार आहेत. दरम्यान भुयारी गटाराची कामे झाल्यानंतर रस्त्यांची चाळणी होते. मात्र त्यासाठी सुमारे ४० कोटी रुपयांची रस्त्याची कामे मंजूर आहेत. भुयारी गटाराची कामे झाल्यानंतर मुदतवाढ घेऊन तेथील काँक्रीट रस्ते पूर्ण केले जाणार आहेत.
२२ एमएलडीचा एसटीपी प्लँट
शहराच्या प्रत्येक गल्लीतून सर्व गटाराचे तसेच स्वच्छतागृहाचे पाणी जमिनीखालून बंद पाईपलाईनद्वारे भोगावती नदीच्या पात्रालगत आणले जाणार आहे. तेथून पुढेही नदीच्या बाजूस आलेले पाणी बंद पाईपलाईनद्वारे शहराच्या आग्नेय दिशेला (गावसूदकडे जाणाऱ्या मार्गावर) जावून तेथे मलनित्सारण (एसटीपी) प्रकल्प होणार आहे. तेथे पाण्यावर तसेच मैलावर प्रक्रिया करून स्वच्छता प्रक्रिया प्रकल्प राबविली जाणार आहे.
असा होणार फायदा
नागरिकांना यापुढे बांधकाम करताना सेफ्टीक टँक (स्वच्छतागृहाचा) बांधण्याची गरज नसते. गटाराचे पाणी जमीनतून जात असल्याने साथीचे रोग पसरण्याचा धोका कमी असतो. शहरात दुर्गंधी अथवा पाणी कोठेही साचून राहत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना स्वच्छतेसाठी याचा मोठा फायदा होतो.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.