उस्मानाबाद जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, वीज पडून महिला शेतकरी ठार

Thunderstorm Killed Surekh Garad Osmanabad
Thunderstorm Killed Surekh Garad Osmanabad

उस्मानाबाद : जिल्ह्याच्या अनेक भागात रविवारी (ता.११) वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असून वीज पडून महिला शेतकरी ठार झाली आहे. वादळामुळे केशर आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही गावातील नागरिकांच्या घरावरचे पत्रे उडाले आहेत. दरम्यान उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसाचा दिलासा मिळाला आहे.


वीज पडून महिला शेतकरी ठार
खेड (ता.उस्मानाबाद) येथील महिला शेतकरी सुरेखा ज्ञानोबा गरड (वय ४९) यांचा वीज पडून जागीच मृत्यू झाला आहे. शेतातील कांदे काढण्याचे काम सुरू होते. त्यांच्यासोबत सविता तुकाराम गरड अन्य एक महिला होती. दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास वादळी वारा सुरु  झाला. त्याचवेळी पावसाने हजेरी लावली. म्हणून वडाच्या झाडाखाली बसण्यास गेल्या होत्या. त्याच दरम्यान सुरेखा यांच्या अंगावर वीज पडून  जागीच मृत्यू झाला. तर सविता जखमी झाल्या असून त्यांना तातडीने उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.

दोन दिवसांपासून पाऊस
सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस  जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस हजेरी लावित आहे. शनिवारी (ता.दहा) सायंकाळच्या सुमारास कळंब तालुक्यातील गोविंदपूर, देवधानोरा, मंगरुळ, शेळके-धानोरा आदी भागांत जोरदार हजेरी लावली. वादळासह सुमारे अर्धातास पाऊस झाला. दरम्यान वाऱ्यामुळे अनेक ठिकाणच्या आंबा बागेचे नुकसान झाले आहे. रविवारी ही जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाला आहे. भूम तालुक्यातील ईट परिसरातही वीजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. यावेळी वादळी वाराही मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय पाथरुड परिसरात रविवारी पहाटे, तुरोरी (ता. उमरगा), अचलेर (ता. लोहारा), उस्मानाबाद तालुक्यातील आळणी, खामगाव, रुई येथेही वादळी वारा तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.

घरावरील पत्रे उडाले, आंब्याचेही नुकसान 

येडशी येथे काही कुटुंबाच्या घरावरील पत्रे उडाले आहेत. यामध्ये जीवनावश्याक वस्तुंचेही नुकसान झाल्याने संसार उघड्यावर आला आहे. रविवारी वादळाचा वेग मोठा होता. जिल्ह्यात केशर आंब्याचे क्षेत्र मोठे आहे. वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांच्या केशर आंब्याचे नुकसान झाले आहे. आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचा खच साचल्याचे दिसून येत होते.

शहरातही पावसाची हजेरी

गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. रविवारी आलेल्या पावसाने दिलासा मिळाला आहे. शहरातही सुमारे १५ मिनिटे पाऊस झाला. त्यामुळे वातावरणातील उकाडा कमी होण्यास मदत झाली आहे.

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com