लाख मोलाची पपई झाली मातीमोल, शेतकऱ्याने फिरवला रोटावेटर

केसरजवळगा (ता. उमरगा) : बाजारपेठ बंद असल्याने अमोल जाधव यांनी पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवला.
केसरजवळगा (ता. उमरगा) : बाजारपेठ बंद असल्याने अमोल जाधव यांनी पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवला.

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : लॉकडाऊनमुळे बहुतांश बाजारपेठा बंद असल्याने पपई घ्यायला कोणीही व्यापारी पुढे यायला तयार नाहीत. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्याने चार एकरातील बागेवर बुधवारी (ता. ६) रोटावेटर फिरवून संपूर्ण बागच मोडीत काढल्याने लाख मोलाची पपई मातीत मिसळली.

देशभरात कोरोनाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे बाजारात पपई घ्यायला ग्राहक नसल्याने कोणताही व्यापारी गेल्या दीड महिन्यापासून पपई घेण्यासाठी समोर आलाच नाही. परिणामी, काढणीला आलेली पपई शेतातच सडून गेली. केसरजवळगा (ता. उमरगा) अमोल बलभीम जाधव या तरुण शेतकऱ्याने उसनवारी करीत सुमारे तीन लाख रुपये खर्च करुन शेतातील चार एकरात गतवर्षी मार्चमध्ये पपईची चार हजार झाडांची लागवड केली होती.

वर्षभर चांगली जोपासना करीत पपईची बाग जगवली. यातून जवळपास पंधरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र पपई ऐन काढणीला आली असताना कोरोनाचे संकट आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. २२ मार्चपासून लॉकडाऊन असल्याने फळे व भाजीपाला, शेतमाल हे वेळेत काढून त्यांची बाजारात वेळेत विक्री करणे अनेक शेतकऱ्यांना जमले नाही. त्यामुळे शेतमाल, फळबागांचे नुकसान झाले.

बाजारपेठा बंद असल्याने मागणीच नसल्याचे कारण सांगत अनेक व्यापारी कवडीमोल दराने फळे, भाजीपाला खरेदी करीत योग्य दराने ग्राहकांना विक्री करीत नफा मिळवत आहेत. तर दुसरीकडे वर्षभर कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात मात्र दमडाही नाही.

अमोल जाधव यांनी बाजारात एकही पपई विक्री केली नाही. पपईच्या बागेसाठी त्यांनी तीन लाख रुपये खर्च केले; मात्र ऐन काढणीच्या काळात कोरोनाचे संकट आल्याने पपईला मागणी नसल्यामुळे कोणताही व्यापारी त्यांच्याकडे फिरकला नाही. हताश झालेल्या जाधव यांनी बुधवारी चार एकरातील पपईच्या बागेवर रोटावेटर फिरवून संपूर्ण बागच जमीनदोस्त केल्याने लाख मोलाची पपई अखेर मातीमोल झाली. 
 

कोरोनामुळे सरकारने लॉकडाऊन जाहीर केले. यात जीवनावश्यक वस्तुची विक्री सुरु ठेवली; मात्र बाजारात पपईला मागणीच नव्हती. त्यामुळे काढणीला आलेली पपई शेतातच सडून गेली. बागेसाठी तीन लाख खर्च केले. प्रत्यक्षात एक रुपयांची पपई देखील विक्री झाली नाही. त्यामुळे वैतागून अखेर बुधवारी रोटावेटर फिरवून संपूर्ण बागच मोडीत काढली. काही दिवसांवर खरीपाची पेरणी आहे. उसणवारी करुन लावलेल्या पपईच्या बागेचे पैसे कसे फेडायचे याची चिंता आहे. सरकारने किमान खरीपाच्या पेरणीसाठी खते, बियाणे तरी मोफत द्यावेत. 
- अमोल जाधव, शेतकरी 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com