महावितरणची वीज तोडणी मुक्या जनावरांच्या जीवावर, शेतकरीही अडचणीत  

Mahavitaran News
Mahavitaran News

उस्मानाबाद : महावितरण कंपनीने जिल्ह्यात वीजतोडणी सुरू केली असून त्याचे पडसाद मुक्या प्राण्यांवर उमटत आहे. वितरण  रोहित्रावरील वीजपुरवठा खंडीत केला जात असून त्यामुळे मुकी जनावरांची तहान भागवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. कंपनीकडून किमान एक तासभर वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.  जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या वीजबिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी कंपनीचे कर्मचारी थेट रोहित्राचा वीजपुरवठा  खंडीत करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून थकबाकी असल्याने कंपनीचे कर्मचारी थेट वीजजोडणी तोडत आहेत. याचा परिणाम शेतीच्या पिकावर होत आहे. दरम्यान पिकांना एखादा दिवस पाणी मिळाले नाही तरी फारसा फरक पडत नाही. पिके वाळून आर्थिक नुकसान होते. 

मात्र हल्ली बहुतांश शेतकऱ्यांकडे किमान एक ते दोन जित्राब (जनावरे) आहेत. यामध्ये दुधाळ जनावरांचा समावेश आहे. अशा जनावरांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. यातील अनेक जनावरे दुभती तर आहेतच, पण काही जनावरे गाभण असतात. अशा जनावरांना वेळेवर पाणी मिळणे आवश्यक असते. मात्र सध्या वीज कंपनीकडून वीजतोडणीची मोहिम केली जात असल्याने अनेक मुकी जनावरे तहानाने व्याकूळ होऊ लागली आहेत. त्यामुळे अशा जनावरांसाठी कंपनीने किमान एक तास वीज द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

संवाद साधून वीज तोडा
यंदाच्या वर्षात शेतकऱ्यांना शेती उत्पन्नातून चार पैसे आले आहेत. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन शेतकऱ्यांशी संवाद साधणे. त्यांना वीजबील भरण्यासाठी प्रवृत्त करणे. असे प्रकार व्हायला पाहिजेत. थेट वीजपुरवठा खंडीत करण्याच्या ऐवजी अनेक शेकतरी बिल भरण्यास तयार असतात. मात्र कंपनीच्या अशा भूमिकेमुळे ग्रामीण भागात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊ लागली आहे. त्यात उन्हाचा  कडाका वाढल्याने जनावरांच्या घशाला कोरड पडत आहे. माणुसकीच्या नात्याने किमान एक तास वीजपुरवठा करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

गाभण जनावरांना वेळेत पाणी द्याव लागतं. तुम्ही गावाची वीज तोडीत असताल तर जनावरं कशी जगत्याल. का तुम्ही जनावरं मारायच लायसन काढलय का? अस करू नका, किमान एक तास तरी पाण्याची लाईट सोडा.

- नामदेव कोरे, शेतकरी.

 

कडक उन्हाळा सुरू झालाय. आता काही भिजन नाही. पण, जनावरांच काय करायच. पिक असत तरी वाळल असत. पण, जनावरं मारायची का? मुक्या जनावरांचा काय दोष हाय. जे शेतकरी वीजबील भरणा करीत नाहीत. त्यांच कनेक्शन खुशाल तोडावं. पण, सरसकट डीपी बंद करू नयेत. अन्यथा किसान सभेच्यावतीने जिल्ह्यात मोठं आंदोलन उभ करावं लागल.

- तानाजी वाघमारे, जिल्हाध्यक्ष, किसानसभा, उस्मानाबाद

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com