साहेब, हाताला काम नाही, आम्ही जगायचं कसं...

बेळंब तांडा (ता. उमरगा) : जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन केलेल्या मजुरांना वापरासाठी पाणी नसल्याने कोरडे पडलेले ड्रम व टाकी.
बेळंब तांडा (ता. उमरगा) : जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाइन केलेल्या मजुरांना वापरासाठी पाणी नसल्याने कोरडे पडलेले ड्रम व टाकी.

केसरजवळगा (जि. उस्मानाबाद) : साहेब, कामधंदा नाही, जवळ पैसा-अडका नाही, रेशनही संपले. वापरासाठी पाणीही वेळेवर मिळत नाही. आम्ही जगायचं कसं? किमान आम्हाला घरी तरी सोडा, अशी विनवणी बेळंब तांडा (ता. उमरगा) येथील शाळेमध्ये क्वारंटाइन केलेल्या मजुरांकडून करण्यात येत आहे. त्यांना सध्या किमान आठवडाभर पुरेल एवढे किराणा साहित्य देण्याची गरज आहे.

बेळंब तांडा येथील दहा ते बारा कुटुंबे नाला बंडिंग व ऊसतोडीच्या कामासाठी सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील सोनहिरा साखर कारखान्यावर गेले होते. मात्र लॉकडाउनमुळे महिनाभर सांगली जिल्ह्यात अडकून पडले होते. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील इस्लापुरात कोरोनाचे २६ रुग्ण आढळले होते. त्यामुळे गावाकडे परतण्याची ओढ मजुरांना लागली.

राज्य सरकारकडून ऊसतोड मजुरांना गावी पाठवण्याची मुभा देण्यात आली. त्यानुसार कारखान्याचे पत्र घेऊन जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेतली. २२ एप्रिल रोजी मुरूम (ता. उमरगा) पोलिस ठाण्यात दाखल होऊन सर्वांची माहिती देऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार बेळंब तांडा येथील जिल्हा परिषद शाळेत चौदा दिवस सर्व १० कुटुंबांना क्वारंटाइन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनाकडून सुरवातीला धान्य व पाण्याची व्यवस्था करण्यात आली; मात्र गेल्या दोन दिवसांपासून धान्य व किराणा माल, भाजीपाला, पाणी संपल्यामुळे मजुरांचे हाल सुरू आहेत.

कामधंदा नसल्यामुळे सांगली जिल्ह्यात महिनाभर बसून होतो. तेथे प्रशासनाने १५ दिवस पुरेल इतके रेशन व किराणा दिले होते. तेथेही १४ दिवस क्वारंटाइन केले होते. या काळात सर्व व्यवस्था प्रशासनाकडून चांगली करण्यात आली. कोरोनाला घाबरून आम्ही गावी आलो. आम्हाला कोणताही आजार नसताना गावकऱ्यांनी पुन्हा आम्हाला क्वारंटाइन केले. गावात प्रवेश नाही तर किमान रेशन व पाणी तरी द्या, नाही तर आम्हाला घरी सोडा, अशी मागणी मजूर करीत आहेत.

यासंदर्भात सरपंच महानंद कलशेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही मजूर गावात आल्यानंतर सुरवातीला ५० किलो तांदूळ दिले. त्यांना पिण्यासाठी दररोज पाण्याचे पाच जार दिले जातात. तर टँकरने वापरण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. दोन दिवस विजेअभावी वापराचे पाणी देता आले नाही.

आज पाण्याची व्यवस्था करण्यात येईल, तसेच मुरूम येथून १०० किलो ज्वारी व किराणा साहित्यही पोचविण्यात येईल. यासंदर्भात शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड यांनीही गरजू मजुरांना शिवसेनेकडून लवकरच मदत मिळेल, असे सांगितले. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लॉकडाउनमध्ये हजारो मजूर अडकले असून, सर्वांची व्यवस्था करणे शक्य नाही. तरीही लवकर मदत पोचविण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले. 

रेशनकार्ड असल्यास त्यांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्यात येईल. क्वारंटाइन केलेल्या लोकांना प्रशासनाकडून काही मिळणार नाही. ग्रामपंचायत प्रशासन व गावातील नातेवाइकांनी त्यांची व्यवस्था करावी. 
- संजय पवार, तहसीलदार, उमरगा 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com