सेंद्रिय शेतीतून २० लाखांची बचत

गुंज येथील योगानंद संस्थानचा तब्बल चारशे एकरांत प्रयोग
parbhani 20 lakhs savings from organic farming
parbhani 20 lakhs savings from organic farming

पाथरी : रासायनिक शेतीला फाटा देत तालुक्यातील गुंज (जि. परभणी) येथील योगानंद संस्थानने झिरो बजेट संकल्पनेतून आपली चारशे एकर शेतजमीन सेंद्रिय पद्धतीने पिकवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संस्थानला यंदा खरिपासाठी रासायनिक औषधी व खताची खरेदी करावी लागली नाही. त्यातून पहिल्याच वर्षी २० लाख रुपयांची बचत झाली.

रासायनिक खते, औषधी, कीटकनाशके यांच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे शेतीचा खर्चही वाढत आहे. दरम्यान, रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा अतिवापर मानवी आरोग्यासह जमिनीच्या आरोग्यासाठीही घातक आहे. त्यामुळे शेतीचा खर्च कमी व्हावा, लोकांना सकस आणि आरोग्यदायी अन्नधान्य, डाळी व फळे मिळावीत, या हेतूने संस्थानने सेंद्रिय शेतीचा निर्णय घेतला. संस्थानने आपली चारशे एकर शेती सेंद्रिय लागवडीखाली आणली. त्यातून पहिल्याच वर्षी तब्बल २० लाख रुपयांची बचत झाली.

गोशाळेतून शेणखत

संस्थान अंतर्गत गोशाळा चालवली जाते. त्यातून मोठ्या प्रमाणावर शेणखत उपलब्ध होते. दरम्यान, विषमुक्त आणि झिरो बजेट शेतीची संकल्पना पुढे आली. ती संस्थानने कृतीत उतरवून तीन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर पाच एकर ऊस व तीन एकर केसर अंबा लागवड केली होती. संस्थानने आता यंदा पहिल्यांदाच आपली चारशे एकर जमीन विषमुक्त करण्याचा निर्णय घेत खरीप हंगामातील ऊस, सोयाबीन, तूर, मूग ही पिके घेतली आहेत.

अशी तयार करतात सेंद्रिय निविष्ठा

ताक आणि गूळ यापासून बनवलेले गोकृपा अमृत हे १०० प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्ये असलेले औषध पेरणी आधी जमिनीवर व पीक २० दिवसांचे झाल्यानंतर फवारणी करतात. यामुळे पिकाचे नत्र, स्फुरद आणि पालाश उपलब्ध होते. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचीही वाढ होते. अग्नी अस्त्र व दशपर्णी अर्क हे कीटकनाशकाला पर्याय म्हणून वापरले जाते. यामुळे शत्रू किडीचा नायनाट होऊन मित्र किडीची वाढ होते.

रासायनिक खत हवे; पण प्रमाणात

औरंगाबाद येथील विभागीय कृषी शिक्षण केंद्राचे कृषी सहायक रामेश्‍वर ठोंबरे यांनी सांगितले की, पूर्वी रासायनिक खतांचा वापर केला जात नव्हता. पूर्वी जनावरे मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शेणखत उपलब्ध व्हायचे. आता शेणखत कमी असल्याने त्याचा वापरही कमी झाला. उत्पादनवाढीसाठी रासायनिक खतांचा वापर गरजेचा आहे. मात्र, तो प्रमाणबद्ध असला पाहिजे.

जमिनीतील सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीची ताकद असते आणि ही ताकद शेणखतामुळे वाढते. पिकांच्या आणि जमिनीच्या पोषणासाठी पोषक सूक्ष्म जिवाणू वाढीसाठी शेणखत अतिशय महत्त्वाचे आहे. दहा एकर शेती असली तरी किमान दोन एकरात तरी सेंद्रिय शेती केली पाहिजे. जमिनीच्या आणि माणसांच्या उत्तम आरोग्यासाठी सेंद्रिय शेती आजची गरज आहे.

संपूर्ण शेती सेंद्रिय शक्य आहे का?

आपल्या देशातील संपूर्ण शेती सेंद्रिय असावी, असा विचार समोर येत आहे. पण, देशातील संपूर्ण शेती सेंद्रिय पद्धतीने पिकवणे सध्या तरी शक्य दिसत नाही. श्रीलंकेने रासायनिक खतावर आयातबंदी घालून त्यांच्या देशात सेंद्रिय शेतीची सक्ती केली होती. पण, त्यासाठी लागणाऱ्या सेंद्रिय खताचे नियोजन श्रीलंकेकडे नव्हते. गरजेएवढे खत शेतकऱ्यांना मिळाले नाही. त्यातच चीनने श्रीलंकेला भेसळीचे खत पाठवले. त्यातून पिकांवर कीड पडली. परिणामी, श्रीलंकेच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. त्याचा त्यांच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे सेंद्रिय शेती करायची तर अगोदर नियोजन गरजेचे आहे. आवश्यक तेवढे सेंद्रिय खत उपलब्ध असेल तरच हा प्रयोग करावा, असा सल्ला कृषीतज्ज्ञ देत आहेत.

रासायनिक खतांमुळे जमीन कडक होत आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे; म्हणूनच आम्ही गुजरातच्या धर्तीवर सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेऊन त्याची सुरुवात केली आहे. पहिल्या दोन वर्षात नेहमीपेक्षा उत्पन्न कमी झाले तरी भविष्यात ते वाढून आरोग्यदायी व विषमुक्त धान्य मिळेल.

- राजेश देसाई, विश्वस्त गुंज संस्थान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com