परभणी जिल्ह्यात परसबागेतून पिकवला जातोय विषमुक्त भाजीपाला

parbhani
parbhani

परभणी : शेतीमध्ये रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळे दुर्धर आजारांमध्ये वाढ होत आहे. ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक असल्याने या भागातून विषमुक्त अन्न निर्माण करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशने पुढाकार घेतला आहे. गंगाखेड व पालम तालुक्यातील ग्रामीण भागात ‘घर तेथे परसबाग’ व ‘घरा-घरामध्ये पोषण उत्सव’ ही मोहिम राबविली जात आहे. आतापर्यंत या दोन्ही तालुक्यातील ६० गावांमध्ये ४०० पेक्षाही जास्त परसबाग तयार करण्यात आल्या आहेत.

गंगाखेड व पालम तालुक्यामध्ये रिलायन्स फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली उमेद, माविम, महिला आणि बाल विकास विभाग यांच्या सहकार्याने पोषण, आरोग्यविषयक जनजागृती तसेच गावोगावी लोकांना परसबागेचे महत्व पटवून दिले जात आहे. ताजा, पौष्टिक, सकस, विषमुक्त, कमी जागेत आणि उपलब्ध पाण्यामध्ये कुटुंबाला दररोज पुरेसा होईल असा सकस व विषमुक्त भाजीपाला उत्पादीत करण्यासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे.  

कोरोनाच्या संकटकाळात लोकांना ज्यांच्या त्यांच्या घरीच भाजीपाला उपलब्ध व्हावा, या उद्देशाने रिलायन्स फाउंडेशन व उमेदची संपूर्ण टीम गावोगावी जाऊन लोकांना पोषण जनजगृती, परसबागेचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती कार्यक्रम देखील घेतले जातात. यासाठी लागणारे तांत्रिक सहाय्य तसेच बियाणे सुद्धा रिलायन्स फाउंडेशनमार्फत दिले जात आहे. बियाणे किटमध्ये १२ ते १५ प्रकारच्या भाजीपाल्याचे गुणवत्तापूर्ण खात्रीचे बियाण्यांचा समावेश आहे. आजपर्यंत पालम आणि गंगाखेड या तालुक्यामध्ये जवळपास ६० गावांमध्ये पोषण विषयी जनजागृती आणि ४०० पेक्षा जास्त परसबाग तयार झाल्या आहेत.

सकस आहारासाठीची मोहिम

ग्रामीण भागात बालकांमध्ये कुपोषण व महिलांमध्ये अनेमियाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालल्याचे चित्र आहे. शेती कामाचा व्याप, अपुरी माहिती, योग्य व सकस आहाराची कमतरता यामुळे ग्रामीण भागात अशा समस्या घर करून आहेत. शेतीमध्ये होणारे रासायनिक खते व कीटकनाशके यांचा बेसुमार आणि अति वापर यामुळे अनेक नवनवीन आजार निर्माण होत आहेत. या सर्वांवर एक उपाय आहे, तो म्हणजे विषमुक्त अर्थात सेंद्रिय भाजीपाल्याचा रोजच्या आहारात वापर करणे, हा या मोहिमेचा उद्देश आहे. 

- घर तेथे परसबाग आणि घरा-घरामध्ये पोषण उत्सव
- रिलायंन्स फाउंडेशनची मोहीम
- ग्रामीण भागात मोहिमेला अधिक गती
- महिला व मुलांच्या आरोग्याच्या काळजीवर भर


ग्रामस्थांचा स्वेच्छेने सहभाग

सध्या मुबलक पाणी उपलब्ध असल्याने गावकरी स्व-इच्छेने परसबाग तयार करताना दिसत आहेत. यामुळे निश्चितच कुपोषण व अनेमिया सारख्या समस्या कमी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा असल्याचे रिलायन्स फाऊंडेशनचे टीमलिडर रावसाहेब परमार म्हणाले.  


संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com