परभणी : गाळातून काढले सौंदर्याचे लेणे

वालूर येथे बारवेची स्वच्छता, दुसऱ्या बारबेचेही काम सुरू
Parbhani excavation during garbage found caves
Parbhani excavation during garbage found cavessakal

वालूर : येथे ऐतिहासिक चार बारव आहेत. पण, काळाच्या ओघात गाळ-कचरा यामुळे ते बुजले होते. अवती-भवती अस्वच्छता पसरली होती. ग्रामस्थांनी श्रमदानातून रात्री बारापर्यंत घाम गाळत यातील एक बारव मोकळी केली. त्यातील गाळ, कचरा काढला. त्यानंतर उत्कृष्ट स्थापत्य कलेने साकारलेल्या या प्राचीन बारवेचे सौंदर्य पाहून सर्वांना भुरळ पडली. दुसऱ्या बारवेच्या स्वच्छतेला गुरुवारी सुरुवात झाली.

गावाने एकत्र येऊन एखादी गोष्ट मनावर घेतली तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही, हेच येथील बारवेच्या पुनरुज्जीवन मोहिमेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले. वालूर हे निजाम राजवटीतील तालुक्याचे ठिकाण होते. आजच्या सेलू तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून वालूरचा उल्लेख होतो. परंतु, येथील प्राचीन वारशाची परवड डोळ्याला देखवत नव्हती. इतिहासप्रेमींसह जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायत, गावातील सुज्ञ नागरिकांनी एकदाचे मनावर घेतले व अद्भुत असे चित्र समोर आले. सरपंच संजय साडेगावकर, गणेश मुंढे, शैलेश तोष्णीवाल, ग्रामपंचायत सदस्य यांच्या पुढाकारातून या बारवेच्या पुनरुज्जीवनाकरिता गाव सरसावले.

गुरुवारी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांच्या उपस्थितीत दुसऱ्या बारवेच्या स्वच्छतेस प्रारंभ झाला. यावेळी नायब तहसीलदार प्रशांत थारकर, महम्मद इस्माईल अन्सारी, खुदरुतुल्ला अन्सारी, तलाठी निकेश पराचे, शैलेश तोष्णीवाल यांच्यासह श्रमदान करीत असलेले नागरिक उपस्थित होते.

अशी झाली तयारी

संकल्प सोडल्यानंतर या ग्रामस्थांनी रात्रीला श्रमदान करायचे म्हणून बारव परिसरात रात्री फोकस लावले. पाण्याचा टँकर, घंटागाडी तयार ठेवली. श्रमदानास प्रारंभ केला. मारोती बोडखे, मुकुंद मुंढे, दत्ताजी राख, प्रल्हादराव दराडे, भास्कर लांडे, भगवानरव दराडे, वाल्मीकी दराडे, नागेश दराडे, ऋषिकेश राख, कुलदीप राख, श्रीहरी आबूज, गोपाळ आबूज, गणेश खरबे आदींनी योगदान दिले.

रात्री उशिरापर्यंत सुरु असणाऱ्या या मोहिमेतून अख्ख्या महाराष्ट्रात नाही अशी वैशिष्ट्यपूर्ण ‘हेलीकस स्टेपवेल’ स्वच्छता मोहीम अक्षरशः रंगात आली. बारवाचे सौंदर्य जसजसे प्रकट होत गेले तसतसा श्रमिकांचा उत्साह वाढला. स्थापत्य सौंदर्याचा उत्तम नमुना ठरलेल्या या बारवेच्या सौंदर्याने श्रमदान करणाऱ्या कार्यकर्त्यांचे चेहरे तर उजळलेच. परंतु, अख्खे गाव बारवे भोवती गोळा झाले. ‘तुज आहे तुजपाशी’ अशीच काहीशी अवस्था या ग्रामस्थांची झाली. अख्खा महाराष्ट्रात अशा बांधणीची बारव आढळलेली नाही, असे अभ्यासकांचे मत आहे. आपण या बारवेच्या प्रेमात पडलो आहोत, अशी प्रतिक्रिया फेसबुकद्वारे काही अभ्यासकांनी व्यक्त केली.

इतर ठिकाणीही काम

जिल्ह्यात पेडगाव, मानवत, कासापुरी येथे श्रमदानातून बारवसंगोपनाचे काम सुरू आहे. जिंतूर, भोगावं, बोरकिनी येथेही लवकरच नियोजन केले जात आहे. ग्रामीण भागात ऐतिहासिक वारसा संवर्धनाची स्वयंस्फूर्त चळवळ हा मराठवाड्यात कुतूहलाचा विषय ठरतो आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com