परभणी : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात बायोगॅसपासून विद्युत निर्मिती सुरू

परभणी पालिकेकडून खत निर्मिती, सुक्या कचऱ्यावर लवकरच प्रक्रिया
Parbhani solid waste management project
Parbhani solid waste management project

परभणी - महानगरपालिकेने वारंवार आवाहन करुन, दंडात्मक कारवाई करुनही शहरातील नागरिक ओला-सुका कचरा वेगवेगळा देत नसल्यामुळे आता मिक्स कचरा बोरवंड येथील घनकचरा प्रकल्पाला अडसर ठरु लागला आहे. सद्यःस्थितीत बायोगॅस व त्यापासून विद्युत निर्मिती सुरु झाली असून, येत्या दोन महिन्यांत खत निर्मिती व सुक्या कचऱ्यावरील प्रक्रियेला सुरवात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी यंत्रसामग्री देखील आल्याचे दिसून येत आहे. महानगरपालिकेने अतिशय महत्वाकांक्षी व शहरातील कचऱ्याची समस्या नष्ट करणारा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गंगाखेड रोडवरील बोरवंड येथे सुरु केला आहे.

त्यावर २० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पात ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस व वीज निर्मिती, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती, सुक्या कचऱ्यावर प्रक्रीया करुन त्यापासून वस्तुंची निर्मिती अशा विविध प्रकल्पांचा समावेश आहे. हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास शहरातील कचऱ्याची समस्या कायम स्वरुपी निकाली लागू शकते.

महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी जनजागृतीसह ओला-सुका असा वर्गीकृत कचरा न देणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरु केली होती. त्यामुळे काही नागरिक वर्गीकृत कचरा देत आहेत तर कारवाई बंद झाल्यामुळे मिक्स कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. महापालिकेने धाररोडवरील डंपिंग ग्राउंड तर बंद केले. त्यामुळे असा मिक्स कचरा बोरवंड येथे जात असून तेथे देखील कचऱ्याचे डोंगर तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर

या प्रकल्पाअंतर्गत बायोगॅस संयंत्र सुरु झाले आहे. त्यामध्ये दररोज दहा टन ओला कचरा वापरला जात असून, त्यातून विद्युत निर्मिती देखील सुरु झाली आहे. या प्रकल्पाची क्षमताच दररोज दहा टनाची असल्यामुळे उर्वरित ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती केली जाणार आहे. तर, सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन त्यापासून विविध उत्पादने तयार केली जाणार आहे. परंतु, हे दोन्ही प्रकल्प अद्याप सुरु झालेले नसून, यंत्रसामग्री या परिसरात आलेली असून, शेडचे काम सुरु आहे.

प्रकल्प ठरु शकतो उत्पन्नाचा स्रोत

बोरवंड येथील प्रकल्प महापालिकेच्या उत्पन्नाचा एक मोठा स्त्रोत ठरु शकतो. येथे खत निर्मितीसह सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन विविध उत्पादने देखील काढली जाणार आहे. पालिकेने योग्य नियोजन करुन पूर्ण क्षमतेने प्रकल्प कार्यान्वित ठेवल्यास तो एक महापालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत ठरु शकतो.

वर्गीकृत कचरा मिळत नसल्याने अडचणी

महानगरपालिकेचे आयुक्त देविदास पवार एका बैठकीत म्हणाले होते की, ओल्या कचऱ्यापासून सोने निर्माण होणार आहे. परंतु, नागरीकांनी आपल्या घरातील कचरा वेगवेगळा करुन देणे आवश्यक आहे. ५०-६० नागरिक वर्गीकृत कचरा देतात, परंतु उर्वरित नागरिक मिक्स कचरा देत असल्यामुळे तो पुन्हा वेगळा करण्यासाठी वेळ, श्रम व खर्च वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी ओला व सुका, घातक व इलेक्ट्रॉनिक्स असा वर्गीकृत कचरा दिल्यास प्रकल्पातून विविध उत्पादने काढणे सोयीचे जाणार आहे.

महापालिकेच्या बोरवंड येथील प्रकल्पात बायोगॅस व विद्युत निर्मिती सुरु झाली आहे. खतनिर्मिती प्रकल्प व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पावसामुळे या कामात व्यत्यय येत आहे. पुढील दोन महिन्यांत संपूर्ण प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल.

-देविदास पवार, आयुक्त, महानगरपालिका, परभणी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com