परभणी : शेतीत नुकसान झाले काय ? मग तातडीने विमा कंपनीस कळवा- कृषी जिल्हा अधिक्षक

file photo
file photo

परभणी ः मागील दोन दिवसापासून परभणी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतीतील पिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे शेतात काढून ठेवलेले सोयबिन पावसामुळे भिजले असेल व शेतकऱ्यांनी त्याचा विमा काढला असेल तर नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनी कडे नोंदवावी लागणार आहे. या संदर्भात स्वता जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी सोमवारी (ता. 12)  शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.

परभणी जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून सर्वदूर पाऊस होत आहे. या पावसाचा जोरदार फटका जिल्ह्यातील शेतीला बसला आहे. सध्या सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढून गोळा न करता शेतात वाळवण्यासाठी तसेच ठेवलेले आहे. दोन दिवसात झालेल्या पावसामुळे शेतातील सोयाबीन भिजल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

'काढणी पश्‍चात नुकसान भरपाई'

सोयाबिन भिजले असल्यास ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचा विमा उतरविला आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसान झाले असल्यास 'काढणी पश्‍चात नुकसान भरपाई' या सदराखाली पिक विमा मिळू शकतो. याची माहिती कृषी विभागाच्यावतीने दिली जात आहे. यासाठी पीक विम्यासाठी सोयाबीन अधिसूचित क्षेत्रातील शेतात सोयाबीन कापणी करून सुकवण्यासाठी पसरून ठेवलेल्या ठिकाणी कापणीपासून 14 दिवसात गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीस ग्राह्य धरता येतात अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी दिली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सदरची घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत याबाबतची सूचना रिलायन्स इन्शुरन्स पिक विमा कंपनी किंवा कृषी विभागास देणे बंधनकारक आहे असे ही श्री. आळसे यांनी सांगितले आहे.

पहाणीनंतर नुकसानीचा अहवाल दहा दिवसात सादर

यामध्ये नुकसान काळविताना सर्वे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळवणे ही बंधनकारक आहे. प्राप्त झालेल्या सुचनेनंतर संयुक्त समिती शेतकऱ्याच्या नुकसान झालेल्या क्षेत्राची पहाणी करेल. यामध्ये विमा कंपनी प्रतिनिधी, कृषि अधिकारी व संबंधित शेतकरी यांचा समावेश असणार आहे. पहाणीनंतर नुकसानीचा अहवाल दहा दिवसात सादर करण्यात येईल. त्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय राज्यशासन घेवू शकते. व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळू शकते असेही संतोष आळसे यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांना आवाहन

ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, अशा शेतकऱ्यांनी गूगल प्ले स्टोअर वरून (crop insurance) हे ॲप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती द्यावी किंवा (18001024088 / 180030024088) या टोल फ्री क्रमांकावर किंवा (rgicl.pmfby@relianceada.com) या ई-मेल वर किंवा कृषि विभागाच्या कार्यालयात अर्ज करून कळवावे.

- संतोष आळसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com