आम्ही थकून गेलो, चौथी टाळेबंदी तुमचीच! लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Latur Collector G.Sreekant, Sakal
Latur Collector G.Sreekant, Sakal

लातूर : सलग तिसऱ्या लॉकडाउनपर्यंत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनातील प्रत्येक घटकांनी मेहनत घेतली आहे. रात्रंदिवस कोरोनाला रोखण्याचे काम करताना आम्ही थकून गेलो आहोत. यामुळे चौथी टाळेबंदी यशस्वी करण्याची जबाबदारी आता जनतेचीच आहे. यामुळे ही टाळेबंदी जनतेचीच असून जनता ते नक्कीच यशस्वी करून दाखवेल, असा विश्वास जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला.
रविवारी (ता. १७) फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात बोलताना त्यांनी लोकांना भावनिक साद घालत थकलेल्यांना मदत करण्याचे आवाहन केले. चौथ्या टाळेबंदीच्या पूर्वसंध्येला बोलताना त्यांनी तीन टाळेबंदीमध्ये प्रशासनाने कोरोनाला रोखण्यासाठी राबविलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला.

कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनातील पोलिस व अन्य यंत्रणा रात्रीचा दिवस करीत आहेत. डोळ्यांत ते घालून पहारा देत कोरोनाला जिल्ह्यात पाय ठेवू देत नाहीत. सलग तीन टाळेबंदींमध्ये रात्रंदिवस काम करून जिल्हा पोलिस अधीक्षकांपासून पोलिस शिपायापर्यंत सर्वजण थकून गेले आहेत. यामुळे थकलेल्यांना मदत करण्यासाठीच चौथी टाळेबंदी यशस्वी करून दाखविण्याची जबाबदारी जनतेची आहे. थकवा अंगावर घेऊन जास्त काम केल्यास अनेक सुरू केलेल्या गोष्टी बंद कराव्या लागतील, असेही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

तपासणी नाक्यावरच होम क्वारंटाईनचा शिक्का, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

काळजी घ्या, टाळेबंदी यशस्वी करा
चौथी टाळेबंदी यशस्वी करण्यासाठी लोकांना फार काही दिव्य पार पाडायचे नाही, असे नमूद करून केवळ चौदा दिवस सुरक्षा नियमांचे चांगले पालन करायचे आहे. नियमित मास्कचा वापर करायचा आहे. विनाकारण घराबाहेर पडायचे नाही. बाजारात आल्यानंतर सुरक्षित शारीरिक अंतराचे पालन करायचे आहे. घरातील ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिलांची काळजी घ्यायची आहे. लोकांनी ठरविले तरच चौथी टाळेबंदी यशस्वी होणार आहे. बाजारपेठेत सर्व व्यवसाय सुरू व्हावेत, अशीच प्रशासनाची भूमिका आहे. बेशिस्त दिसून आल्यास व्यवसाय बंद करावे लागतील. बाजूच्या जिल्ह्यातून व्यवसायांना एवढा वेळ कशाला दिला म्हणून विचारणा होते. धाडसी निर्णय घेतल्याचे बोलतात. माझा निर्णय यशस्वी करायचा की अयशस्वी करायचा, हे तुमच्या हातात असल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले.

लातूरकर गड राखून ठेवणार
लातूरमध्ये तीन टाळेबंदी यशस्वी झाल्या आहेत. लातूरकरांनी कोरोनापासून आपला गड राखून ठेवला आहे. यामुळे एखाद-दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह निघाला म्हणून घाबरून जाऊ नका. मजबूत राहा. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घरात व्यायाम करा. योगासन व प्राणायाम करा. फुफ्फुसाची ताकद वाढवा. पॉझिटिव्ह रुग्णांना बळ द्या. भीती बाळगाल तर मानसिक ताण वाढेल. सुरक्षा नियमांचे पालन उत्साहाने करा. त्यासाठी प्रशासनाला दंड करण्याची संधीच देऊ नका, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com