गरिबांच्या धान्यावर डल्ला मारणाऱ्यांवर होणार कारवाई

माजलगाव : लवकरच सुरू होणार सधन लाभार्थ्यांची शोधमोहीम
Ration Shop
Ration Shopsakal

माजलगाव : गोरगरिबांसाठी शासनाने सुरु केलेल्या अन्नसुरक्षा योजनेत अनेक धनदांडग्या लाभार्थ्यांनी घुसखोरी केल्याने खरे गरजू लाभार्थी या योजनेपासून वंचित आहेत. महसूल प्रशासनाकडून लवकरच रेशन कार्डची पडताळणी मोहीम सुरु केली जाणार असून गरिबांच्या योजनेचा लाभ घेणाऱ्या धनदांडग्यांचा शोध घेतला जाणार आहे. स्वतःहून सधन लाभार्थ्याने या योजनेतून बाहेर न पडल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

समाजातील गोरगरीब, निराधार, गरजू नागरिकांना सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळावे यासाठी राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेची अंमलबजावणी फेब्रुवारी २०१४ पासून सुरु करण्यात आली आहे. आधार सीडिंगच्या आधारे शिधापत्रिका वाटप करून लाभार्थ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. असे असले तरी गोरगरिबांसाठी असलेल्या या योजनेत धनदांडग्या सधन लाभार्थ्यांनीही यात मोठ्या प्रमाणात घुसखोरी करून या योजनेचा लाभ लाटला आहे. यात सरकारी, निमसरकारी नोकरधारक, व्यावसायिक, पेन्शनधारक, चारचाकी वाहनधारक, आयकर भरणारे नागरिक, बागायती शेतकरी यासारख्या सधन नागरिकांचा समावेश आहे. यामुळे ज्यांना या योजनेची खरी गरज आहे असे गरजू लाभार्थी अन्नसुरक्षा योजनेपासून वंचित राहत आहेत.

अशा लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महसूल प्रशासनाकडून सधन लाभार्थ्यांसाठी ‘अन्नधान्याच्या योजनेतून स्वेच्छेने बाहेर पडा’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. यासाठी स्वस्त धान्य दुकानदारांकडे फॉर्मचा नमुना ठेवण्यात आला असून सधन लाभार्थ्यांनी तो भरून स्वेच्छेने बाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच शिधापत्रिकांची पडताळणी मोहीम सुरु करण्यात येणार असून यात अपात्र लाभार्थी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही महसूल प्रशासनाकडून देण्यात आला आहे. माजलगाव तालुक्यात रेशन दुकानातून सवलतीच्या दरात धान्य उचलणाऱ्या रेशनकार्डधारकांची एकूण संख्या ६५ हजार २६ आहेत. यात खरे लाभार्थी मात्र किती हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

योजनेचे लाभार्थी

ज्यांना पक्के घर नाही. जे मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवतात. ज्यांचे उत्पन्न शहरी भागात ५९ हजार तर, ग्रामीण भागात ४४ हजार रुपये आहे. ज्यांच्याकडे रिक्षा, टॅक्सी वगळता इतर चारचाकी वाहन नाही.

माजलगाव तालुक्यात ६५ हजार लाभार्थी

  • ३९,९४९- सर्वसाधारण प्राधान्य कार्डधारक

  • १५,३३१ - शेतकरी प्रधान कार्डधारक

  • ३४१२ - अंत्योदय कार्डधारक

  • ६३३४ - एपीएल कार्डधारक

तालुक्यातील अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिका पडताळणी मोहिमेचा आदेश काढण्यात आला आहे. या योजनेत असलेल्या सधन लाभार्थ्यांनी स्वतःहून यातून बाहेर पडावे; पडताळणीत आढळून आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

-वर्षा मनाळे, तहसीलदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com