पीक नुकसानीचे पंचनामे करा: पालकमंत्री वर्षा गायकवाड 

santra nuksan
santra nuksan

हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यातील सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा, हिंगोली या पाचही तालुक्यांमध्ये अवकाळी पावसासोबतच गारांचा पाऊस पडला. यात गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच फळबागांचेदेखील नुकसान झाले आहे.


 या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी दिले आहेत. जिल्ह्यात झालेल्या गारपिटीचा मोठा फटका फळबागांना बसला आहे. पावसामुळे द्राक्ष, मोसंबी, संत्रा, केळी, लिंबू, डाळिंब अशा फळबागांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत, यासाठी खासदार ॲड. राजीव सातव यांनी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यानंतर पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

हेक्‍टरी ५० हजारांची मदत द्या : खासदार हेमंत पाटील

हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड, किनवट, हदगाव, वसमत, सेनगाव, औंढा, कळमनुरी व हिंगोली विधानसभा क्षेत्रात बुधवारी (ता. १८) वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन पिकांचे मोठे नुकसान झाले. त्‍याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभेत केली आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

बेमोसमी पावसामुळे व गारपिटीने शेतातील काढणीस आलेल्या हरभरा, संत्रा, कांदा, गहू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावल्या गेला आहे. या आस्मानी संकटाने शेतकऱ्यांना सावरण्यासाठी केंद्र सरकारने प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून जिल्हा प्रशासनाने तत्काळ पंचनामे करावेत, अशी आग्रही मागणी लोकसभेत खासदार हेमंत पाटील यांनी केली आहे.

पिकांचे पंचनामे करा : आमदार संतोष बांगर 

कळमनुरी(जि. हिंगोली): तालुक्यात बुधवारी (ता. १८) झालेल्या अवेळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली आहे. कळमनुरी तालुक्यात बुधवारी अनेक भागात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली.

मदत मिळवून देण्याकरिता बोलणार

यामुळे गहू, हरभरा हळद, केळी, ऊस, कांदा, टरबूज आदी पिकांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील फुटाणा, वारंगा फाटा, कुर्तडी, आखाडा बाळापूर, शेवाळा, भाटेगाव, चिखली, चुंचा या भागात तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी व परिसरात झालेल्या गारपिटीने केळीचे पीक आडवे झाले आहे. हसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली आहे. शासनाकडून आवश्यक ती मदत मिळवून देण्याकरिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे आ. श्री. बांगर यांनी सांगितले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com