Jalna News : व्यापाऱ्यांनो, तुमचा कामगार गुन्हेगार तर नाही?

पोलिस पडताळणीकडे अनेकांचा कानाडोळा : शहरात व्यापाऱ्यांना लुटीचे प्रकार वाढले
jalna
jalnasakal

जालना : उद्योग आणि व्यापारीनगरी म्हणून ओळख असलेल्या जालना शहरात रोजगारासाठी राज्यासह परराज्यातून अनेक नागरिकांचे स्थलांतर झाले आहे. विविध व्यापारी दुकानांसह स्टील, सीडस् उद्योगांमुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. मात्र, मागील काही काळाचा इतिहास पाहिला तर व्यापाऱ्यांकडील रोकड लुटीचे प्रकारही वाढले असून तपासामध्ये व्यापाऱ्यांकडे काम करणाराच अनेक गुन्ह्यात संशयित आरोपी निघाले आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनो तुमच्या दुकानातील कामगार गुन्हेगार तर नाही ना? आपल्या कामगाराची पडताळणी पोलिसांकडून करून घेतली आहे ना? अन्यथा तुमच्या गल्ल्यावरही हातसाफ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

जालन्यात सळई उद्योग, व्यापारी पेठ असल्याने शहरात कोट्यवधी रुपयांचा व्यवहार रोज होतो. त्यामुळे सळई उद्योगासह व्यापारी वर्गाला ही कामगारांची मोठी गरज भसते. परिणामी ओळखीच्या व्यक्तींकडून अनेकदा व्यापारी, उद्योजक कामगारांना आपल्याकडे कामावर ठेवून त्यांच्यावर मोठा विश्वास टाकतात. परंतु, या कामगारांच्या चारित्र पडताळणीकडे कानाडोळा केला जातो.

मात्र, व्यापारी, उद्योजकांकडे काम करणाऱ्यांची पोलिस प्रशासनाकडून पडताळणी करणे अपेक्षित आहे. परंतु, तसे होते नाही. त्यात सळई उद्योग आणि व्यापारी वर्गात रोजचा येणाऱ्या पैशांसह इतर व्यवहार बहुतांश रोख स्वरूपात होत असतात. उद्योजक, व्यापारी मुनीम किंवा कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या रकमेची एकमेकांना देवाण-घेवाण करतात. हा सर्व व्यवहार दुकानासह कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसमोर होतो.

ही रोकड बॅंकेसह दुकानातून घरी घेऊन जाताना किंवा इतरांना देण्यासाठी घेऊन जाताना कोणतीही सुरक्षा न बाळगता दुचाकीवर रोकडची वाहतूक केली जाते. त्यामुळे चोरट्यांकडून रेकी करून लूटमारी केल्याचे अनेक गुन्हे यापूर्वी घडले आहेत. या गुन्ह्यांत अनेकदा व्यापारी, उद्योजकांकडे काम करणाराच टीप देणारा असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. त्यामुळे कामगारांची पोलिस पडताळणी करून आपल्याकडे गुन्हेगारी वृत्तीचा कामगार तर नाही ना? याची व्यापारी, उद्योजकांनी खात्री केलेली बरी.

पोलिस पडताळणी कोणाची करावी

दुकानामध्ये, कंपनीमध्ये एखाद्यास कामगार म्हणून रुजू केल्यानंतर संबंधित व्यक्तीचे आधार कार्डसह त्याची माहिती पोलिसांना देऊन तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे का? याची पडताळणी करणे अपेक्षित आहे. ही प्रक्रिया घर मालकांनीही भाडेकरू ठेवताना देखील करणे अपेक्षित आहे. अन्यथा घरमालकांवर पोलिसांमध्ये गुन्हे दाखल होऊ शकतात. घर कामासाठी महिला-पुरुष ठेवताना ज्या हद्दीत पोलिस ठाणे आहे, त्या पोलिस ठाण्याला घरात काम करणाऱ्या महिला व पुरुषाची माहिती द्यावी.

‘त्या’ गुन्ह्याचा अद्याप तपास नाही

मागील महिन्यात भोकरदन नाका ते कृषी उत्पन्न बाजार समिती मार्गावरील वरकड हॉस्पिटल परिसरातील श्रीराम टाइल्स ॲण्ड स्टोन्स या दुकानाजवळ भर दिवसा तीन भामट्यांनी जय छाजेड यांच्याकडील सहा लाखांची रोकड ठेवलेली पिशवी लंपास केली होती. हा प्रकार भर दिवसा झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, या गुन्ह्याचा अद्याप उलगडा झालेला नाही.

चारचाकीचा वापर बरा

शहरातील औद्योगिक वसाहतीसह व्यापारी वर्गाने मोठ्या रकमेची वाहतूक करताना सुरक्षारक्षक सोबत ठेवणे अपेक्षित आहे. सुरक्षारक्षक ठेवणे शक्य नसेल तर किमान चारचाकी वाहनातून रकमेची वाहतूक करणे ही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून फायदेशीर आहे. मात्र, उद्योजक, व्यापाऱ्यांकडून लाखो रूपयांची ने-आण करण्यासाठी त्यांचे कर्मचारी दुचाकीचा वापर करतो. त्यामुळे वाटमारीसारख्या घटना घडतात.

तर हे होतील फायदे

दुकान, कंपनीत, घर कामासाठी ठेवल्या व्यक्तीची पडताळणी पोलिसांकडून केली तर तो गुन्हेगारी वृत्तीचा आहे की नाही? हे लक्षात येईल. शिवाय तो गुन्हेगारी वृत्तीचा असेल तर पुढील अर्थ टाळता येईल.

जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील आणि परराज्यातील अनेक जण रोजगाराच्या शोधात येतात. त्यामुळे त्यांना घर किरायाने देताना त्यांचा घरमालकांना इतिहासाची माहिती नसते. पोलिस पडताळणीनंतर गुन्हेगारी वृत्ती असलेल्या व्यक्तीला घर किरायाने तर देत नाही ना? याची खातरजमा होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com