

"अधिकारी गायब, खुर्चीलाच सुनावले गाऱ्हाणे!" बदनापूर महावितरण कार्यालयात रोशनगावच्या ग्रामस्थांचा अनोखा 'जागर'.
Sakal
बदनापूर : रोशनगाव (ता. बदनापूर) येथे विद्युत जनित्र निकृष्ट पद्धतीने बसविण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या जीवित्वाला धोका आहे. गावठाणात देखील विद्युत खांब बसविण्यात आलेले नाही. या संदर्भात महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी निवेदन देऊन देखील दखल घेतली जात नाही, असा आरोप करून सोमवारी (ता. १३) रोशनगाव येथील ग्रामस्थांनी टाळ - मृदुंगाच्या ठेक्यावर "ज्ञानबा - तुकारामा" च्या जयघोषात थेट बदनापूर येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. मात्र निवेदन घेण्यासाठी उपकार्यकारी अभियंता हजर नसल्याने संतप्त मोर्चेकऱ्यांनी त्यांच्या खुर्चीलाच निवेदन सादर केले.