

From Crisis to Solution: Impact of Media Reporting on Rural Water Supply
Sakal
आडूळ : दाभरूळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रेखानाईक तांडा व बालाजीनगर तांडा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरील रोहित्र जळाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला होता. परिणामी महिलांना रखरखत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत होती. या गंभीर समस्येची दखल घेत दैनिक सकाळने ता. १६ मे २०२६ रोजी “रेखानाईक, बालाजीनगर तांडा येथे भीषण पाणीटंचाई; रोहित्र जळाल्याने महिलांची भर उन्हात भटकंती” या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. बातमी प्रसिद्ध होताच जिल्हा परिषद सदस्य शिवराज भुमरे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर तत्काळ नवीन रोहित्र बसविण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे विहिरीवरील विजपुरवठा सुरळीत झाला असून बालाजीनगर तांडा येथे पाणीपुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला आहे.