शेतकऱ्यांची फसवणूक;  बियाने उगवलेच नाही !

file photo
file photo

परभणी : जिल्ह्यात सोयाबीन पिकाचे बियाणे उगवले नसल्याचा तक्रारी सुरू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनच्या बाबतीत सुरवातीलाच संकट निर्माण झाले आहे. बहुतांष खासगी बियाणे कंपन्या विरोधात तक्रारी येत आहेत. गतवर्षी अतिवृष्ठीने पीक हातचे गेले होते. यंदा पेरणीच्या तोंडालाच संकट ओढावल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

यंदाच्या खरीप हंगामाला सुरवात झाली असून १५ दिवसांपासून शेतकरी पेरणी करत आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक पेरणीचे क्षेत्र सोयाबीन पिकाचे आहे. तब्बल दोन लाख १९ हजार २०२ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी प्रस्तावित आहे. आतापर्यंत एक लाख २४ हजार ५०४ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. परंतु, मागील चार दिवसांत शेतकरी सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. पाऊस पडल्यानंतर अनेक भागात पेरण्या सुरू झाल्या. शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी सुरू केली आहे. बहुतांष शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या शिफारसीनुसार बिजप्रक्रिया करूनच आणि चांगली मशागत करुन पेरणी केली आहे. मात्र, बियाणे उगवले नसल्याचा प्रकार समोर येत आहेत. त्यामध्ये खासगी कंपन्याचे बियाणे उगवत नसल्याच्या तक्रारी आहेत.

खासगी बियाणे उशिराने दाखल
गतवर्षी सोयाबीन काढणी वेळी सलग २२ दिवस अतिवृष्टी झाली होती. संपूर्ण मराठवाड्यातील सोयाबीन भिजल्याने यंदाच्या पेरणीवेळी उगवनक्षमतेवर प्रश्न उभे राहिले होते. शेतकरी पेरणीसाठी घरच्या बियाणासह महाबीज, खासगी कंपन्यांचे बियाणे वापरतात. गतवर्षी सोयाबीन भिजल्याने यंदा त्याची उगवण क्षमता तपासून घेण्याचे आवाहन कृषी विभागाने केले होते. तसेच मे महिण्यात आणि जून महिन्याच्या सुरवातीला उगवण क्षमता तपासणीसाठी गावोगावी जात कृषी विभागाने प्रात्यक्षिक करून दाखवले होते. बहुतांष प्रयोग हे घरच्या बियाणावर करण्यात आले होते. खासगी बियाणे हे उशीराने बाजारात दाखल झाले. तसेच ऐन पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केल्याने ते थेट पेरणीसाठी वापरले. तेव्हा बोगस बियाणाचा प्रकार लक्षात आला.

कृषी विभागाकडे सोमवारी तक्रारी देणार
मराठा सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चार दिवसांपासून सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी जमा केल्या असून त्या एकत्रित सोमवारी (ता. २२) जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे देण्यात येणार असल्याची माहिती नितीन देशमुख यांनी दिली. झाडगाव, शिर्शी बु., बोर्डा, साटला, कोल्हावाडी, आसेगाव, चिंचोली, नांदापूर, चांदज येथील शेतकऱ्यांचे तक्रार अर्ज आले असल्याची माहिती श्री. देशमुख यांनी दिली.


शेतकरी संघर्ष समितीची तक्रार
आर्वी (ता. परभणी) येथील काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीनचे खासगी कंपन्यांचे बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकरी संघर्ष समितीने जिल्हा कृषी अधीक्षक, उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे. संबंधित कंपनीच्या बियाणे विक्रीवर जिल्ह्यात बंदी घालून कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा नोंदवावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर माणिक कदम, अनंत कदम, रामप्रसाद कदम, सिद्धेश्वर कदम, प्रभाकर कदम, पंढरी कदम, श्रीकृष्ण कदम, संदीप कदम, किरण कदम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
 

....पावतीसह तक्रार करा
जिल्ह्यात काही भागात बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी येत आहेत. बियाणात दोष असल्याचा प्रकार समोर येत असून शेतकऱ्यांनी संबधीत तालुका कृषी कार्यालयाकडे बियाणे खरेदीची पावती जोडून तक्रार करावी. त्यानंतर समिती प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. पेरणी करताना बियाणाची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी.

- संतोषराव आळसे, जिल्हा कृषी अधीक्षक, परभणी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com