
लातूर : संचारबंदीच्या काळात गरीब, गरजू नागरिकांना जेवण उपलब्ध व्हावे म्हणून शहरातील तिन्ही ठिकाणच्या शिवभोजन केंद्रांना मंगळवारपासून (ता. ३१) सुरवात झाली. याशिवाय, आणखी तीन नव्या शिवभोजनालयाला प्रशासनाने मान्यता दिली असून या नव्या भोजनालयाचा ‘श्रीगणेशा’ बुधवारी (ता. एक) होणार आहे. या निर्णयामुळे शहरातील शिवभोजनालयांची संख्या आता सहावर पोचली आहे. मात्र, या सर्व ठिकाणी येणाऱ्या ग्राहकांना थाळीऐवजी पार्सल स्वरूपात जेवण दिले जाणार आहे.
‘कोरोना’चा फैलाव होऊ नये म्हणून वेगवेगळ्या पातळ्यांवर दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने, हॉटेल, खाणावळी, मॉल बंद ठेवण्यात आले. त्याप्रमाणे शिवभोजन थाळीही बंद करण्यात आली. त्यामुळे जेवायचे कोठे, असा प्रश्न अनेक गरीब, कष्टकरी, असंघटित कामगार, स्थलांतरित, बाहेरगावचे विद्यार्थी, रस्त्यावरील बेघर असलेल्यांना पडला आहे. त्याचा विचार करून राज्य सरकारने शिवभोजन थाळी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहरातील मुख्य बसस्थानक, गंजगोलाई आणि मार्केट यार्ड या भागातील तिन्ही शिवभोजनालयांना आजपासून सुरवात झाली. येथे योग्य ती दक्षता घेतली जात आहे का, याची पाहणी करण्यासाठी शिवभोजनालयाला अधिकारी वारंवार भेटीही देत आहेत.
याशिवाय, शिवाजी चौकातील पोलिस ठाण्याच्या बाजूस असलेल्या महालक्ष्मी भोजनालयात (विशाल कापसे), शिवाजी चौकातील ब्रीज हॉटेलच्या बाजूस (अविनाश पाटील) आणि शहरातील अंबाजोगाई रस्त्यावरील नवीन रेणापूर चौकात (रंजना कांबळे) शिवभोजन थाळी सुरू करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे.
हे तिन्ही केंद्र बुधवारपासून (ता.एक) सुरू होणार आहेत. या सर्व केंद्रांना सकाळी ११ ते दुपारी तीन अशी वेळेची मर्यादा देण्यात आली आहे. प्रत्येक थाळीला पाच रुपये आकारण्याची परवानगी देण्यात आली आहे. याबरोबरच लातूर ग्रामीण, रेणापूर, औसा, उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकोट, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ या तालुक्यांच्या ठिकाणीही आता शिवभोजनालयाची सुरवात होणार आहे. दरम्यान, शिवभोजनालय पुन्हा सुरू झाले आहे, याची माहिती अद्याप नागरिकांपर्यंत पोचली नाही. त्यामुळे आज फारसा प्रतिसाद मिळाला नाही; पण बुधवारपासून प्रतिसाद वाढेल, अशी माहिती शिवभोजनालयाचे चालक नितीन जनवाडकर आणि महादू घोडके यांनी ‘सकाळ’ला दिली.
...अशी दक्षता घ्या
- येणाऱ्या ग्राहकांना थाळीऐवजी पार्सल स्वरूपात जेवण द्या
- भोजनालय दररोज निर्जंतुक करूनच स्वयंपाकाला सुरवात करा
- आचारी, पार्सल वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुवावेत
- ग्राहकांना हात धुण्यासाठी साबण उपलब्ध करून द्यावा
- भोजनालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करावा
- येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांमध्ये कमीत कमी तीन फूट अंतर ठेवावे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.