Video-विधायक : नांदेडमध्ये कोरोनाशी झुंजणाऱ्या घटकांसाठी राबताहेत ‘हे’ हात

Nanded News
Nanded News

नांदेड : कोरोनाशी  झुंजणाऱ्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, आत्महत्याग्रस्त शेतकरी तसेच शहीद जवानांच्या कुटुंबांना फळ-भाज्यांची मदत पोचवून ‘शेतकरी जगला पाहीजे’ या धेय्यानुसार नांदेडमधील उपक्रम राष्ट्रीयस्तरावर कौतुकास पात्र ठरला आहे.

कोरोना विषाणूला हरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देवून तसेच शेतकरी जगला पाहिजे यासाठी समाज कल्याण विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी पुढे आले आहेत. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. वाहतुकव्यवस्थाही थांबली आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जगला पाहीजे हे धेय्य समोर ठेवून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने हा उपक्रम सुरु केला असून, तो देशातील पहिला ड्रीम पायलट प्रोजेक्ट म्हणून नावारूपास आला आहे. 

असा आहे प्रामाणिक हेतू
शासनाच्या निधीशिवाय स्वतः निधी उभारून जिल्ह्यातील दिव्यांग पालक म्हणून जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांच्या पुढाकारातून ‘शेतकरी जगला पाहिजे’ हा उपक्रम सुरु केला. त्यात शेतकऱ्यांचा माल खरेदी करून दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, शहीद जवान कुटुंबीयांसह ‘कोरोना’शी दोन हात करून रात्रंदिवस मेहनत घेणारे डॉक्टर्स, नर्स, पोलिस बांधव यांना मोफत वाटप करण्यात येत आहे. अडचणीच्या काळात गरजुंना मदत करणे हाच मानवतेचा खरा धर्म आहे. हे सर्व करत असताना शेतकरी कष्ट करून त्यांनी आपण पिकविलेल्या मालाची किंमत ठरविण्याचा अधिकार नाही. त्यांची प्रत्येक ठिकाणी पिळवणूकच होत आहे. ती थांबावी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कोरोनाच्या महामारीत त्याला रास्त भाव मिळावा हा यामागील प्रामाणिक हेतू आहे.   

दोन हजार ५०० गरजुंना घरपोच वाटप
कोणाच्याही मध्यस्थीशिवाय शेतकऱ्यांचा माल थेट नांदेड येथील कलेक्शन सेंटरवर जमा होतो. कागदी ग्लासमध्ये पाणी आणि गुळाचा खडा देऊन शेतकऱ्यांचे स्वागत केले जाते. त्यांनी आणलेल्या मालाचे वजन काटा करून लगेच त्यांच्या ‘आधार’ संलग्न असलेल्या बँक खात्यावर Online Payment दिले जाते. शेतकऱ्यांनी केंद्रावर आणलेला टोमॅटो, कांदा, आलू, हिरवी मिर्ची, भेंडी, पालेभाज्या, गोबी, अद्रक, लसूण आदी १६ ते १८ प्रकारच्या भाज्या स्वच्छ करून कापडी पिशवीमध्ये भरल्या जातात. या पिशव्या शहरातील दोन हजार ५०० गरजुंना घरपोच वाटप केल्या जात आहेत.   

आमचा उपक्रम कौतुकास ठरला पात्र
काही दिवसांतच पहिल्या टप्प्यात पुणे, औरंगाबाद, नागपूर, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, सोलापूर, बीड जिल्हयांतही या उपक्रमाला सुरुवात होत आहे. समाजकल्याण  विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी एकत्रीत येऊन राबवलेला ‘शेतकरी जगला पाहिजे’ हा ऊपक्रम राष्ट्रीय स्तरावर कौतुकास पात्र ठरला आहे.
- सतेंद्र आऊलवार, समाज कल्याण अधिकारी (जिल्हा परिषद, नांदेड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com