हुंड्यावरच अडतेय आजही सोयरीक : कशी ते वाचाच

File photo
File photo

नांदेड : आताचा जमाना बदलला आहे. सगळे शिकले. सवरलेत. प्रबोधनाच्या दोन, चार गोष्टी सुसंस्कृत समाजातील लोक चारचौघात सांगतात; की हुंडा देणे आणि घेणे गुन्हा आहे. आमच्या समाजात वा कुटुंबात हुंडा घेण्याची संस्कृती नाही, असेही ठणकावून सांगितले जाते. मात्र, एकमेकांची पसंती झाल्यानंतर उपवर मुला, मुलीची सोयरीक, जुळविण्याची वेळ येते, तेव्हा बोलणीसाठी (हुंडा) बैठक बसल्यानंतर लग्नाचे घोडे अडते ते हुंड्यावरच. कायदा कठोर झालातरी हुंड्याची देवाणघेवाण केली जात असल्याचेच चित्र समाजासमाजामध्ये बघायला मिळत आहे. समाज सुशिक्षित सुसंस्कृत झाला असे म्हणणे हुंडापद्धतीमुळे चुकीचे ठरत आहे.

मुलींच्या संख्येत होतेय घट
मुलगा हाच वंशाचा दिवा समजून मुलींचा गर्भातच गळा घोटला जात आहे. मुलगाच हवा, असा हट्ट धरणाऱ्या विकृत समाजप्रवृत्तीमुळे मुलींच्या संख्येत घट झाली आहे. परिणामी उपवर मुलांना लग्नाकरिता मुली मिळणे दुरापास्त झाले आहे. याची सर्वांना जाणीव असतानाही हुंडा प्राधान्याने मागितला जातो. एक हजार पुरुषामागे ९१५ मुली असे प्रमाण आहे. जो वडील आपल्या मुलासाठी हुंडा मागतो, त्याला आपल्या मुलीच्या लग्नाकरीताही लाखो रुपयांचा हुंडा मोजावा लागतो, ही बाब समाज सुधारीणांच्या लक्षात का येत नाही, असा सवाल सुजान नागरिक करत आहेत.

नवरदेवाचे भाव वाढलेत
लग्नाच्या बाजारात नोकरीवाल्या नवरदेवाचे भाव अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे. सध्या नोकर भरती बंद आहे. शेती सारखी तोट्यात चालली आहे. शेतकऱ्यांवर कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट येतच आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक मुलीच्या बापाला शेतकरी नवऱ्यापेक्षा नोकरदारच मुलगा मिळायला हवा, अशी अपेक्षा असते. याच नाजूक परिस्थितीचा फायदा काही नोकरदार व उच्च शिक्षित तरुण घेताना दिसत आहे. याउलट मुलगी हे परक्याचे धन आहे, लग्न झाल्यानंतर ती सासरी निघून जाते. मुलगी जर नोकरीत लागून कमावती झाली तर तो पैसा पती आणि सासऱ्यांच्याच मालकीचा असतो, हा मुद्दा कोणी लक्षात घेताना दिसत नाही. हुंडा कायद्याने गुन्हा असलातरी तो गुन्हा प्रत्येक कुटुंबात केला जात आहे. हुंड्याची परंपरा मोडीत केव्हा निघणार? त्यासाठी पुढाकार कोण घेणार? असे प्रश्न आहे. खरे म्हणजे, हुंडा बंद करण्याची पद्धत आपल्या घरातूनच बंद झाली पाहिजे. याचा विचार प्रत्येकाने करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. 

हुंडा घेणे झाले प्रतिष्ठेचे
प्रत्येक आई-वडिलांना मुलगा हवा असतो. त्यासाठी गर्भ तपासणी करून मुलीच्या जन्मावरच घाला घातला जात आहे. यामुळे मुलीच्या संख्येत घट होताना दिसत आहे. तीन ते चार वर्षांपासून राज्य स्त्रीभ्रूणत्येविरोधात भिडले, तेव्हापासून लिंग तपासणीला थोड्याफार प्रमाणात आळा बसला आहे. त्यामधून तपासणीसाठी शेजारच्या राज्यात तर काही जण पर जिल्ह्यात जात असल्याचे बोलले जाते. तिथे मुलगी निघाल्यास गर्भपात करून घरी येतात. यासाठी परिसरात काही दलाल देखील कार्यरत असल्याचे बोलल्या जात आहे. एकंदरीतच दिवसेंदिवस हुंडा घेणे देणे ही काही ठिकाणी प्रतिष्ठा ठरत चालल्याचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com