विद्यार्थी परभणीत, शैक्षणिक साहित्य लातूरला : सांगा ‘नीट’चा अभ्यास करणार कसा?

file photo
file photo

परभणी :  गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी अनेक पालक त्यांच्या पाल्यांना लातूर येथे शिक्षणासाठी ठेवतात. परभणी जिल्ह्यातील असे हजारो विद्यार्थी लातूर येथे शिक्षणासाठी असतात. परंतु, कोरोना विषाणू संसर्गामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे विद्यार्थी आपापल्या घरी परतले होते. टाळेबंदीचा कालावधी वाढत जात असून त्यातच आता नीटच्या परीक्षेची तारीख ही जाहीर झाल्याने आता या विद्यार्थांसमोर मोठा पेच उभा राहिला आहे. त्यांचे शैक्षणिक साहित्य लातूर येथील त्यांच्या रूमवर अडकल्याने अभ्यास कसा करायचा? हा मोठा प्रश्न विद्यार्थांसमोर उभा आहे. त्यामुळे आता प्रशासने या विद्यार्थ्यांच्या समस्येकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

परभणीसह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांतील हजारो विद्यार्थी लातूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी जातात. लातूर येथील शिक्षण संस्थामधून गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असल्याने सहाजिक पालकांची त्या महाविद्यालयाकडे जास्त ओढ असते. दरवर्षी परभणीतून लातूरकडे शिक्षणासाठी धाव घेण्याऱ्या विद्यार्थांची संख्या लक्षणीय असते. यंदाही अनेक विद्यार्थी लातूर येथील महाविद्यालयात प्रवेशीत झालेले आहेत. ते विद्यार्थी वसतिगृहात किंवा खासगी घरे करून राहतात. परंतु, यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे सर्वत्र टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. 

टाळेबंदीमुळे विद्यार्थी परभणीत
या टाळेबंदीचा सुरवातीचा कालावधी २१ दिवसांचा असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी त्यांची पुस्तके त्याच ठिकाणी ठेवून परभणीत आलेले आहेत. परंतु, टाळेबंदीचा हा कालावधी वाढत गेला असल्याने आता विद्यार्थ्यांना अभ्यासाची चिंता सतावत आहे. त्याच नीट परीक्षेच्या तारखाही जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांच्या चिंतेत भर पडली आहे. टाळेबंदी व त्यात जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने लातूर येथे अडकून पडलेले शैक्षणिक साहित्य कसे आणावे, या विवंचनेत हे विद्यार्थी व त्यांचे पालक आहेत.

प्रशासनाने दखल घेण्याची गरज
हजारो विद्यार्थी नीट या परीक्षेला प्रवेशीत झालेले आहेत. परंतू पुस्तकेच पर जिल्ह्यात अडकून पडल्याने अभ्यास करावा कसा, हा मोठा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. त्याच विवंचनेत पालकदेखील आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने विद्यार्थांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

घरभाड्याचे भूतही डोक्यावर
गेल्या दीड महिन्यापासून लातूरमधील विद्यार्थी आपापल्या गावी परतले आहेत. पुन्हा यावे लागेल म्हणून जवळपास सर्वांनीच ते राहात असलेली घरे सोडलेली नाहीत. परंतु, या टाळेबंदीत कुणाकडूनही भाडे घेऊ नका, अशी राज्यशासनाने विनंती केली आहे. परंतु, आज ना उद्या या घरभाड्याची रक्कम या विद्यार्थ्यांच्या पालकांना भरावीच लागणार असल्याने न वापरलेल्या घराचे भाडे देण्याची वेळदेखील पालकांवर आली आहे. अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती बरोबर नाही. त्यातच टाळेबंदीमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. याचा विचार करून हे शैक्षणिक साहित्य आणून घर मोकळे करण्यासाठी लातूर येथे जावू द्यावे, अशी पालकांची मागणी होत आहे.



प्रशासनाने सहकार्य करावे
संपूर्ण महाराष्ट्रातून लातूर येथे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात. टाळेबंदीपूर्वी बरेच विद्यार्थी आपापल्या घरी थोडेफार शैक्षणिक साहित्य घेऊन आलेले असल्यामुळे त्यांचा अभ्यासावर परिणाम होत आहे. त्याचबरोबर शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी सर्वकाही सदन घरचे नसल्याने त्यांच्यावर घर भाड्याचा भूर्दंड राहात नसतानाही येणार असल्यामुळे त्यांचे साहित्य आणण्यासाठी प्रशासनाने विद्यार्थी व विद्यार्थ्यांच्या पालकांना सहकार्य करावे.
- ॲड. राजकुमार भाबरे, विद्यार्थी पालक संघ, परभणी

जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी द्यावी
विद्यार्थ्यांचे साहित्य लातूरला राहिले आहे. तसेच घर भाड्याची अडचण आहे. या कारणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून आम्हाला आमच्या पाल्याचे शैक्षणिक साहित्य परत आणण्याची परवानगी द्यावी, ही विनंती.
- प्रभाकर रणेर, पालक,परभणी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com