
पूर्णा (जि.परभणी) : येथील मागासवर्गीय शासकीय निवासी शाळेतील पस्तीस विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाली. त्यापैकी २६ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पूर्णा येथील पांगरा रस्त्यावर राज्यशासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागासवर्गीय शासकीय निवासी शाळा आहे. तेथे १७५ विद्यार्थी शिक्षण घेतात त्यापैकी गुरुवारी (ता.१०) तेथे उपस्थित असलेल्या १३४ विद्यार्थ्यांनी जेवण घेतले. त्यानंतर ३५ विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, डोके दुखणे असा त्रास होवू लागला. बाधित विद्यार्थ्यांना तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. या वेळी डॉ. नागेश देशमुख, डॉ. जाधव यांनी तातडीने उपचार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांनी तेथे धाव घेतली. २६ विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असून धोका टळल्याची माहिती आहे.
सदरील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणाचे काम पुसद येथील गजानन ट्रेडर्स या कंपनीस देण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना निकृष्ट व दर्जाहीन भोजन दिल्या जात असल्याच्या प्रतिक्रिया ऐकावयास मिळतात. परंतू, उघड लेखी स्वरूपात तक्रार देण्यासाठी कुणीही धजावत नाही. तसा दबाव विद्यार्थ्यांवर टाकल्या जातो अशीही चर्चा आहे.
आयुक्त येण्यापूर्वी भोजनकक्ष चकाचक
दरम्यान, सदर घटनास्थळी समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी पथकासह भेट देवून पहाणी केली व ते विद्यार्थ्यांच्या प्रकृतीच्या पहाणीसाठी नांदेडला रवाना झाले. ते येण्यापूर्वी स्वयंपाक कक्ष, भोजनकक्ष चकाचक करून ठेवण्यात आले होते. प्रसार माध्यमांच्या कोण्याही प्रतिनिधीला सुरक्षा रक्षकांनी आत जावू दिले नाही. अधीक्षक श्री.कोलपेकवार यांनी तसे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. तर भ्रमणध्वनीवरून श्री.कोलपेकवार यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला तरी त्यांनी फोन उचलला नाही.
हेही वाचा - शिवशाही बस ट्रकवर आदळळी, सहाजण जखमी
अनेकप्रश्न अनुत्तरित
शासकीय नियमा प्रमाणे जेवणाचा नमुना चोवीसतास राखीव ठेवावा लागतो तो ठेवण्यात आला होता का?, समाजकल्याण विभागाच्या पथकाने उपलब्ध खाद्य सामुग्रीची पहाणी करून त्यांचे नमुने पंचनामा करून सीलबंद केले का ? उपस्थित १३४ मुलांनी जेवण घेतले मग ३५ मुलांना त्रास का झाला?,आदीं प्रश्न अनुत्तरित आहेत.
कारण अहवाल आल्यानंतर कळेल
सदरील घटने मागचे नेमके कारण तपासणी अहवाल आल्यानंतर कळेल. दोषीवर कडक स्वरुपाची कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांची प्रकृती सुधारत असून काही विद्यार्थ्यांना डिसचार्ज देण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सचिन कवले यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.