डॉ.शिवलिंग शिवाचार्यांचा भक्तीस्थळावरच शेवटचा विसावा, आज रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार होणार

Shivling Shivacharya Maharaj
Shivling Shivacharya Maharaj

अहमदपूर (जि.लातूर) : राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे मंगळवारी (ता.एक) दुपारी फुफ्फुस व छातीचे कंपने कमी झाल्यामुळे नांदेड येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर येथील नांदेड रोडवरील त्यांच्या भक्तीस्थळावर आज रात्री आठ वाजता अंत्यसंस्कार होणार असून त्याची तयारी अनुयायी तसेच भक्तीस्थळाच्या विश्वस्तांनी सुरू केली आहे. दरम्यान जिल्हा व पोलिस प्रशासनाने भक्तीस्थळावर मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.


भक्तीस्थळावरील सभामंडपातीप कळसाखालील जागेवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचे निश्चित झाले आहे. पाच दिवसांपासून महाराजांच्या प्रकृतीवर अनेक तर्कवितर्क सुरू होते. यातच ते २८ ऑगस्ट रोजी संजीवन समाधी घेणार असल्याचे अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली. यामुळे भक्तीस्थळावर मोठ्या संख्येने भाविक जमा झाले. या वेळी महाराज भक्तीस्थळावरच बंद खोलीत उपचार घेत होते. त्यापूर्वी त्यांच्यावर नांदेडच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.

भक्तीस्थळावर मोठ्या संख्येने भाविक जमलेले असतानाच २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्यांनी आपल्या अहमदपूर व हडोळती (ता.अहमदपूर) येथील मठाच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली व पुन्हा नांदेडकडे रवाना झाले. मात्र, त्यांचे हे शेवटचे दर्शन असल्याचे कोणालाही वाटले नाही. महाराजांची प्रकृती बरी होऊन ते पुन्हा भक्तीस्थळावर येऊन उपदेश देतील, अशीच सर्वांची भावना होती. मात्र, दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली. यातच त्यांच्या उत्तराधिकारी नियुक्ती तसेच संजीवन समाधीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

सरकारकडून नियुक्त जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्यासह नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ.विपिन ईटनकर व पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने त्यांच्याशी इनकॅमेरा संवाद साधून उत्तराधिकाऱ्याबाबत असलेला संभ्रम दूर केला. उत्तराधिकारी आपणच जाहिर केल्याचा स्पष्टोक्ती महाराजांनी पथकाकडे देऊन संजीवन समाधीची अफवा पसरवण्याविरोधात कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी पोलिस दलाला चौकशीचे आदेशही दिले होते. यातच सोमवारी (ता.३१) दुपारपासूनच त्यांची प्रकृती आणखी खालावली व मंगळवारी दुपारी त्यांनी शेवटचा श्वास सोडला.   

पहिले डॉक्टर म्हणून ओळख
डॉ.शिवलिंग शिवाचार्य यांचे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात शिष्यगण आहेत. त्यांचा जन्म २५ फेब्रुवारी १९१७ रोजी  अहमदपूर (पूर्वाश्रमीचे राजूर) येथे झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी गुरूच्या स्वाधीन तर आठव्या वर्षी संस्कृत शिक्षणाला त्यांनी सुरवात केली. सन १९३६ मध्ये सोलापूर येथील वारद संस्कृत शाळेत प्रवेश, तर १९४५ मध्ये त्यांनी लाहोर विद्यापीठातून वैद्यकीय अभ्यासक्रमाची (एमबीबीएस) पदवी घेतली. जिल्ह्यातील पहिले डॉक्टर म्हणूनही त्यांची ओळख होती.

महाराजांनी केले ८४ अनुष्ठान
श्रावण शुद्ध प्रतिपदे पासून ते तब्बल २१ दिवस अनुष्ठान करत. या कालावधीत सात दिवस कडुलिंब, सात दिवस दुर्वा तर सात दिवस बेलाच्या पानाचा एक ग्लास रस सेवना व्यतिरिक्त अन्नत्याग केला जातो. महाराष्ट्रासह उत्तराखंड, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश व मध्य प्रदेश या राज्यांतही अनुष्ठाने केली आहेत. वयाच्या विसाव्या वर्षी श्रावण महिन्यातील पहिले अनुष्ठान श्री क्षेत्र कपिलधार (जि.बीड) येथे तर शेवटचे अनुष्ठान वयाच्या १०४ व्या वर्षी हिंगोली जिल्ह्यातील जवळा पांचाळ (ता.कळमनुरी) या ठिकाणी केले. आतापर्यंत त्यांनी एकुण ८४ अनुष्ठाने केली असून या अनुष्ठानाला भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
 

(संपादन - गणेश पिटेकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com