पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू

parbhani News
parbhani News

जिंतूर (जि.परभणी) : वझर बु. (ता. जिंतूर, जि. परभणी) गावालगत असलेल्या पूर्णा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या चुलत भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. एक) सकाळी सातच्या सुमारास घडली. यातील श्रीओम ज्ञानेश्वर पजई (वय १८) व महेश भानुदास पजई (वय १६) असे मृतांची नावे आहेत.

वझर हे गाव पूर्णा नदीकिनारी असून येलदरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातच सध्या सुटीचे दिवस असल्यामुळे सोमवारी सकाळी सातच्या सुमारास चार चुलत भाऊ नेहमीप्रमाणे पाण्यात पोहोण्यासाठी गेले होते. या वेळी यातील श्रीओम व महेश पजई हे दोघे खोल पाण्यात बुडाले. बराच वेळ ते पाण्याबाहेर आले नसल्याने सोबतच्यांनी गावात येऊन या बाबतची माहिती दिली. ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेऊन मुलांना वाचविण्यासाठी प्रयत्न करून त्यांना पाण्याच्या बाहेर काढले.
.
वझर शासकीय रुग्णालयात अधिकारी, कर्मचारी गैरहजर
श्रीओम व महेश या दोघांना गावातील (वझर) शासकीय रुग्णालयात नेले. परंतु, त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी उपस्थित नसल्याने ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला कळविले. मात्र, वेळेवर कोणीच आले नसल्याने ग्रामस्थांनी खासगी वाहनाने जिंतूर येथे ग्रामीण रुग्णालयात दोघांना आणले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळपर्यंत पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती.

जिंतूर तालुक्यात रात्रभर रिमझिम पाऊस
जिंतूर (जि.परभणी) ः शहरासह तालुक्यात रविवारी (ता. ३१) रात्री दहानंतर पावसाची रिमझिम सुरू झाली, ती दुसरे दिवशी पहाटेपर्यंत सुरूच होती. सोमवारी (ता. एक) सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे सायंकाळपर्यंत जिंतूरकरांना सूर्यदर्शन झाले नाही. दरम्यान, ताडपत्री खरेदीसाठी शेतकऱ्यांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.

जिंतूर शहरात रविवारी रोजच्या प्रमाणे उन्हाचा कडाका सुरू असताना सायंकाळी चारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन हलके वारे वाहू लागले. सोबतच विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होऊन काही भागात तुरळक पाऊस झाला. यावेळी पाचेगाव (ता. जिंतूर) येथे वीज पडून कडब्याची वळई जळाल्याची घटना घडली. त्यानंतरही पावसाळी वातावरण कायम राहून रात्री दहानंतर काहीं वेळ हलका पाऊस पडला, तर साडेदहापासून सोमवारी (ता. एक) पहाटे चारपर्यंत पावसाची रिमझिम सुरूच होती. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली असला तरी उकाडा कायम आहे. त्यातच विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांच्या जिवाची घालमेल होत आहे.

बाजारपेठेत शेतकऱ्यांची लगबग
रात्रीचा पाऊस व दुसरे दिवशीच्या पावसाळी वातावरणामुळे आणखी पाऊस पडण्याची शक्यता वाटत असल्याने खरीप लागवड हंगामाच्या पार्श्र्वभूमीवर पावसाने साथ दिल्यास वेळेवर पेरणी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांची बी-बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली. तसेच पावसामुळे चारा वैरण भिजू नये, शेतातील आखाड्यावरील छत झाकण्यासाठी प्लॅस्टिक ताडपत्री खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र शहरात दिसले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com