
हिंगोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस
हिंगोली - हिंगोली जिल्ह्यात रविवारी ता. २४ रात्री दोन वाजता मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने उभ्या टाळकी ज्वारीचे तसेच हळद, आंबा पिकांचे नुकसान झाले. तर वीज कोसळुन बैल दगावल्याची घटना घडली आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम होते. हिंगोली जिल्ह्यात मागच्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला होता. दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. दोन दिवसापूर्वी पावसाच्या हलक्या सरी देखील कोसळल्या होत्या. परत शनिवारी देखील ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रविवारी भल्यापहाटे दोन वाजता विजेच्या कडकडाटात पाऊस झाला. दोन वाजता सुरू झालेला विजेचा कडखकडात साडेपाच पर्यंत सुरू होता.
दरम्यानच्या काळात हलका ते मध्यम स्वरुपाचा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला या पावसाने आंबा पिकासह हळद व शेतात उभ्या असलेल्या टाळकी ज्वारीचे नुकसान झाले आहे. वसमत तालुक्यातील सिरळी येथे शेतात बांधलेल्या सधन मारकड या शेतकऱ्यांच्या बैलावर विज कोसळल्याने बैल दगावला आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा भागात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने शेतात उभ्या असलेल्या टाळकी ज्वारी पिकांचे नुकसान झाले. या पावसात हिंगोली शहरासह अनेक ठिकाणी विज पुरवठा खंडित झाला होता. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर झाला आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे शेतात काढून ठेवलेल्या हळदीचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. अवकाळी पावसाने भाजीपाला पिकांचे देखील नुकसान झाले आहे. यात टमाटे, कोथींबीर, पालक आदीचे नुकसान झाले असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
Web Title: Unseasonal Rain With Thunder In Hingoli District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..