विष्णुपुरी जलाशय बनतोय ‘लव्हर्स पॉईंट’

file photo
file photo

नवीन नांदेड ; जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण हा आशिया खंडातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प म्हणून ओळखला जातो. या धरणाला शंकरसागर या नावाने ओळखले जाते. पुरातन काळातील जाज्वल्य देवस्थानाचा उल्लेख असलेले आणि भाविकांची दक्षिण काशी म्हणून काळेश्‍वर मंदिर व शंकरराव चव्हाण जलाशय हेदेखील असल्याने भाविकांसह पर्यटकांचीही या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी असते. परंतु, आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी प्रेमी युगुलांचे विष्णुपुरी जलाशय ‘लव्हर्स पॉईंट’ बनतो आहे.


विष्णुपुरी परिसरात वैद्यकीय, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन अशा मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्था आहेत. दरम्यान, विष्णुपुरी येथील काळेश्‍वर मंदिरच्या परिसरात सध्या मोठ्या शहरांप्रमाणे प्रेमी युगुलांचा वावर मोठ्या प्रमाणावर होत असून प्रेमी जोडप्यांचा ‘लव्हर्स पॉईंट’ बनत चालला आहे. हे प्रेमीयुगुल बिनधास्तपणे बसलेले पाहावयास मिळतात. सुरक्षेचा अभाव असल्याने प्रेमीयुगलांचे चांगलेच फावले आहे. बाजूला धरण पूर्ण क्षमतेने भरले असून या ठिकाणी कुठलीही सुरक्षा व्यवस्था नाही. एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

पवित्र स्थळ होते अमंगळ


निसर्गरम्य परिसर, काळेश्वर मंदिर आणि शंकरसागर जलाशय असा तिहेरी संगम पर्यटक आणि भाविक यांना साधता येतो. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु, प्रेमी युगलांकडून नवीन जागांचा शोध लावण्यात आलेला दिसून येत आहे. प्रेमी युगलांना येथे नवीन ‘ठिकाण’ सापडले आहे. परिसरातील शंकरसागर जलाशय या ठिकाणचा उपयोग प्रेमी जोडपे घेत असून अनेक तरुण - तरुणींबरोबर अनेक शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी या ठिकाणी मुक्तपणे वावरताना दिसत आहेत.

भाविकांची होतेय कुचंबणा

प्रेमी युगलांचा वाढता वावर यामुळे भाविकांची कुचंबणा होत आहे. परंतु, प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. त्यामुळे अशा वेळी यांवर बंधन घालणे कठीणच असले तरी दर दिवशी महाविद्यालयीन तरुण-तरुणी येथे दर्शनाच्या निमित्ताने का होईना गर्दी करताना दिसत आहेत. परंतु, याच ठिकाणी मंदिरात येणाऱ्या भाविकांना असे काही बघून शरमेने मान खाली घालण्याची वेळ येत आहे.


सार्वजनिक ठिकाणांचा तरुणाईला विसर

आजुबाजूच्या जगाची, ज्येष्ठ नागरिक, सभोताल असलेला परिवार, लहान मुले यांची तरी लाज बाळगणं हे भविष्यात जबाबदार पालक होणाऱ्या या तरुणाईने गंभीरपणे घेणे गरजेचे आहे. अशा सार्वजनिक, धार्मिक, ठिकाणी आपण करीत असलेली वागणूक इतरांना त्रासदायक होणार नाही, याची काळजी सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. परंतु, अशा सार्वजनिक ठिकाणांचा विसर आजच्या तरुणाईला पडलेला दिसत आहे.

पोलिस, सुरक्षारक्षक गरजेचे

पोलिस, सुरक्षारक्षक आदींचे भय वा कुठलेही बंधन नाही आणि सहज उपलब्ध, त्याचबरोबर एकांतवास या ‘प्लस पॉईंट’मुळे परिसर‘लव्ह स्पॉट’ म्हणून येणाऱ्या काळात ‘युगुलप्रिय’ म्हणून प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com