
हिंगोली : प्रत्येक जीवनासाठी पाणी हा महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे.या पाण्याचे महत्त्व अधोरेखीत करुन त्याचा सर्वकाळ उपलब्धता, सुरक्षितता आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी जागतिक जल दिनानिमित जिल्ह्यात ता. २२ ते ता. २७ मार्च या कालावधीत जनजागृती सप्ताह राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबीनोद शर्मा यांनी सांगितले.
दरवर्षी ता. २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून सर्वत्र साजराकेला जातो. त्या अनुषंगाने पाण्याचे महत्व लक्षात घेऊन ते सर्वकाळ उपलब्धतेसाठी आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृतीपर असे विविध उपक्रम आयोजित करणे अपेक्षित आहे.या पार्श्वभूमीवर जागतिक जल दिनाच्या निमित्ताने पाण्याचे महत्व, पाणी पुरवठ्यासाठी वापरात येणारे जलस्रोत यांचे संवर्धन, संरक्षण आणि जुन्या नादुरुस्त जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी योजनांमधील पाणी गळती थांबविणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व ग्रामीण पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पाणी शुद्धता, पाणी वाचवा, पाणी सुरक्षितता आदीबाबत विविध उपक्रम जिल्ह्यातील सर्व तालुक्यात गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत स्तरावर २२ मार्च ते २७ मार्च दरम्यान आयोजित करण्यात आले आहेत.
या सप्ताहांर्तगत २२ मार्च रोजी तालुकास्तरावरील नियोजन बैठकीमध्ये जलप्रतिज्ञा घेऊन जलसप्ताहाचा शपथ देऊन शुभारंभ करणे , २३ मार्च रोजी ग्रामपंचायत , शाळा , अंगणवाडी स्तरावर शुद्ध पाण्याचे महत्त्व समजावून सांगणे आणि सप्ताहाची व्यापकता पटवून देणे , २४ मार्च रोजी पाणी जपून वापरण्याची आवश्यकता व पद्धती डिजीटल माध्यमांचा वापर करुन समजावून सांगणे , २५ मार्च रोजी पिण्याचे पाणी तपासणीमध्ये दुषित आलेल्या स्त्रोतांचे उपाययोजना व दुरुस्तीबाबत माहिती देणे , २६ मार्च रोजी पाणी शुद्धीकरण कार्यपद्धती व टीसीएल वापर याबद्दल व २७ मार्च रोजी सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत व साठवण टाकीची स्वच्छता करणे , शुन्य गळती मोहिम , नादुरुस्त स्त्रोत दुरुस्त करणे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत.तसेच जलजीवन मिशन अंतर्गत लोगो स्पर्धा आयोजीत केली .स्पर्धकांनी जलजीवन बाबत तयार केलेले लोगो राज्यस्तरावर स्पर्धेकरीता पाठविण्यात जाणार आहेत. तसेच जिल्हयातील वाचक,पत्रकार, ग्रामस्थां,करीता जलदिन लेखस्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
दरम्यान, सदरचे उपक्रम राबविताना कोरोना प्रतिबंधक नियमावलीच्या उपाययोजने बाबत केलेल्या प्रचलित नियमानुसार व आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( पाणी व स्वच्छता ) आत्माराम बोंद्रे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत दासरवार यांनी केले आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.