शेकडो गावांचा पाणीप्रश्‍न लोअर दुधना धरणामुळे मिटणार, एकावन्न टक्के पाणीसाठा जमा... 

lover dudhna
lover dudhna

सेलू ः तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस होत असल्याने अर्ध्या पावसाळयातच ५१ टक्के जलसाठा धरणात जमा झाला आहे. त्यामुळे तब्बल चार वर्षांनंतर पावसाळ्याच्या अडीच महिन्यातच धरणात अर्ध्या जलसाठा निर्माण झाला आहे.

यावर्षी लोअर दुधना प्रकल्प धरणात (ता.१९) जूनपासून पाण्याची आवक सुरू झाली. (ता.२०) ऑगस्टपर्यंत दुधनेत ५१.८८ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची अपेक्षा आहे. लोअर दुधना प्रकल्पाच्या पाणी पातळीवर जिल्ह्यातील सेलू शहरासह दुधना नदी काठावरी शेकडो गावांचा पिण्याचा पाणीप्रश्न अवलंबून आहे. गेल्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात पाऊस होऊनही दुधनेत केवळ २० टक्के जिवंत जलसाठा निर्माण झाला होता. नदी काठावरी शेकडो गावासह परभणी शहरासाठी दुधनेतून पाणी सोडून मोठ्या मुश्किलने तहान भागवली होती. त्यामुळे मार्च महिन्यातच प्रकल्प मृतसाठयात गेला होता. 

शेकडो गावांची पाण्याची मदार दुधनेच्या पाण्यावर अवलंबून 
यावर्षी जुन महिन्यापासूनच जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्याने धरणात पाण्याची आवक वेगाने होत आहे. विशेष म्हणजे जुलै महिन्यात सर्वाधिक पाणी धरणात जमा झाले. तसेच अधूनमधून होत असलेल्या जोरदार पावसामुळे दुधनेच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. लोअर दुधना प्रकल्पाच्या जलाश्यातून सेलू आणि जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर आणि ७० गाव ग्रीड योजनेला पाणी उचलले जाते. त्यामुळे दुधनेच्या पाण्यावर शेकडो गावांची पाण्याची मदार अवलंबून आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात दुधनेने एकावन्न टक्के गाठले आहे. 

दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फायदा 
लोअर दुधना प्रकल्पात २०१० पासून पाणी आडवले जाते. २०१६ साली प्रथमच लोअर दुधना प्रकल्प शंभर टक्के भरला होता. २०१७ साली ७८ टक्के, २०१८ मध्ये २१ टक्के तर २०१९ मध्ये १८ टक्के धरणात जलसाठा निर्माण झाला होता. दरवर्षी ऑक्टोंबर अखेरपर्यंत धरणात येणाऱ्या पाण्याची नोंद केली जाते. यंदा मात्र ऑगस्ट महिन्यातच ५१ टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा दहा हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना रब्बी हंगामात पाणी मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

धरणात ५१.८८ टक्के जिवंत जलसाठा
सद्य:स्थितीत लोअर दुधना प्रकल्पात एकूण २२८.२५७ दलघमी एवढा जलसाठा आहे. यात १२५.६५७ दलघमी इतका जिवंत पाणीसाठा निर्माण झाला आहे. जोकी ५१.८८ टक्के आहे. (ता.२०) जून महिन्यात प्रकल्पात ११ दलघमी. जुलै महिन्यात शंभर दलघमी तर (ता.२०) ऑगस्टपर्यंत ५१ दलघमी पाण्याची आवक झाली आहे.

संपादन ः राजन मंगरुळकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com