मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, उपचारासाठी हलवले दवाखान्यात

Suicide Note
Suicide Note

चाकुर (जि.लातूर) : राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे एका उच्च शिक्षित तरूणाने चाकूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरूवारी (ता.दहा) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली आहे. किशोर कदम असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.


बोरगाव (ता.चाकूर) येथील किशोर कदम (वय २५) या तरूणाने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असून तो सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. बुधवारी (ता.९) सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे हताश झालेल्या या तरुणाने तहसील कार्यालयात जाऊन विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आरक्षण रद्द झाल्यामुळे माझे जीवन अंधकारमय झाले असल्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहिली आहे.

हा तरुण आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे माहिती मिळताच तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी स्वत:च्या शासकीय वाहनातून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपक लांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अर्चना पंडगे यांनी त्या तरूणावर उपचार केले. उपविभागीय पोलीस अधिकारी विद्यानंद काळे, पोलिस निरीक्षक जयवंत चव्हाण यांनी त्याचा जवाब घेतला व पुढील उपचारासाठी लातूर येथे पाठविण्यात आले आहे.

मराठा समन्वयकांचे सरकारच्या विरोधात आंदोलन

मराठा आरक्षण हे पाच न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आले. दरम्यान नोकरी, शिक्षणाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायलयाने स्थगिती दिली. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार पाठपुरावा करण्यात कमी पडल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बुधवारी (ता. नऊ) जोरदार निदर्शने केले.


मयूर पार्क येथे हे आंदोलन करण्यात आले. ‘आरक्षण आमच्या हक्काचे, केंद्र सरकार हाय हाय, राज्य सरकार हाय हाय' अशा घोषणा देत समन्वय व कार्यकर्त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. आरक्षणासाठी गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेला लढा अखेरच्या श्‍वासापर्यत सुरू ठेवणार असल्याचे सांगत येत्या काही दिवसांत समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल, असा इशारा यावेळी देण्यात आला. हा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्ते सतीश वेताळ पाटील, मनोज गायके पाटील यांनी व्यक्त केला.

शिक्षण व नोकरीत सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळणे हे सरकारच अपयश आहे. ५८ मूक मोर्चे, ४२ बांधवांचे बलिदान, कोपर्डीच्या ताईचे बलिदान, १३ हजार ७०० बांधवांवर गुन्हे दाखल झाल्यानंतर समाजाला हे आरक्षण मिळाले होते, असे रमेश केरे पाटील यांनी सांगितले. आंदोलनात रेखा वहाटुळे, योगेश औताडे, सुभाष सूर्यवंशी, रवी वहाटुळे, विलास औताडे, बाळू औताडे, अनिल बोरसे, राजेश मेटे, देवा काळे, सचिन शिंदे, तातेराव देवरे, संतोष तुपे यांनी सहभाग घेतला.

संपादन- गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com