जगण्यातील खदखद : आसवांचे हार झाले 

book
book

"आसवांचे हार झाले' हा गझलसंग्रह रमेश निनाजी सरकाटे यांचा आहे. रमेश सरकाटे हे विभागीय आयुक्त म्हणून भुसावळ येथील रेल्वे सुरक्षा बलमधून नोकरी करून निवृत्त झाले आहेत. महाविद्यालयीन जीवनापासूनच साहित्याची आवड असल्यामुळे कवितालेखन, गझल व कादंबरी लेखन त्यांनी केले आहे. "गर्जना' (गझलसंग्रह)', "आसवांचे हार झाले' (गझलसंग्रह )', "जात्यावरची भीमगाणी' (संकलित); त्याचबरोबर "आय. पी. एस.' (कादंबरी) त्यांच्या नावावर आहे. रमेश सरकटे हे पोलिस क्षेत्रातील अधिकारी जरी असले, तरी त्यांचे मन हे संवेदनशील आहे. समाजातील दीन-दलित, सोशित स्त्रिया आणि शेतकरी यांच्या वेदनेमुळे जीवन रडवेले झाले होते. असमर्थनीय झाले होते; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने त्यांच्या जीवनाला, जगण्याला एक अर्थपूर्णता आणली. म्हणजेच त्यांचे जीवन मोतीहाराप्रमाणे मान-सन्मान आणि प्रतिष्ठेचे झाले. म्हणूनच रमेश सरकाटे यांनी त्यांच्या गझलसंग्रहाला समर्पक "आसवांचे हार झाले' हे नाव दिले. 

जळगावच्या अथर्व पब्लिकेशन्सने प्रकाशित केलेल्या "आसवांचे हार झाले' या संग्रहात 98 गझलांचा समावेश आहे. यामध्ये उर्दू, हिंदी, मराठी गझल आहेत. गझल म्हटले, की त्यामध्ये प्रेमाचा भाव येतो. जीवन जगायला प्रेरणा, प्रोत्साहन आणि बळ देण्यासाठी गझल नेहमीच माणसाला बळकट करीत आलेली आहे. जीवनात चैतन्य निर्माण करीत आलेली आहे. प्रेमाच्या शब्दांच्या माध्यमातून शेराच्या माध्यमातून गझल मानवी जीवन फुलविण्याचा, बहरण्याचा प्रयत्न करीत आली आहे. 

रमेश सरकाटे एका गझलेत म्हणतात... 

"मला धैर्य नाही तुला टाळण्याचे 
दिले शब्द तुजला आता पाळण्याचे 
सुटे गंध सारा तुझ्या जीवनाचा 
कशाला बहाणे फुले माळण्याचे...' 

मानवी जीवन जगत असताना संघर्ष, कष्ट, दुःखाचे डोंगर, वेदनांचे डोह अशा अनेक गोष्टींना सामोरे जावे लागतेच; परंतु त्यावरही शब्दांच्या माध्यमातून आधार देऊन जीवनाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न रमेश सरकटे यांनी "आसवांचे हार झाले' यामधील अनेक प्रकारच्या गझलांच्या माध्यमातून केला आहे. जगाकडे पाहत असताना किंवा समाजात वावरत असताना अन्याय- अत्याचारासारख्या मनाला चीड आणणाऱ्या अनेक गोष्टी घडत असतात. ती मनातली चीड, खंतही या ठिकाणी व्यक्त करताना दिसतात; त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाविषयीच्याही भावना अनेक गझलांमधून येताना दिसतात. जगण्याचे बळ देताना दिसतात. ते म्हणतात... 

"निर्धार एवढा की हल्ली डोंगराला 
सामर्थ्य एवढे की तोडीन डोंगराला 
दुबळा मुळीच नाही खंबीर मी मनाने 
लावून जोर सारा मोडीन डोंगराला...' 

रमेश सरकटे हे पोलिस अधिकारी असल्याने अधिकाऱ्यांच्या सेवेबद्दल व लढाईत शहीद झालेल्यांबद्दलचीही भावना त्यांच्या शब्दांमधून ते व्यक्त करतात; त्याचबरोबर मानवी जीवन जगत असताना जे स्वाभिमानाने जीवन जगत असतात, ते कुणापुढेही झुकत नसतात, त्यांना कितीही त्रास झाला, तरी ते आपले जगणे सोडत नसतात. खरेतर त्यांचे ते सत्याचे जगणे असते, ते इतरांना प्रेरणा देणारे असते. म्हणून ते म्हणतात... 

"माफी कशास मागू मी भांडवलोच नाही 
सन्मान मिळविताना मी वाकलोच नाही...' 

अशाप्रकारे रमेश सरकाटे यांच्या "आसवांचे हार झाले' या संग्रहातील गझलांच्या माध्यमातून विविध दुःखाचे पदर उलगडलेले दिसतात; त्याचबरोबर शब्दाच्या माध्यमातून जगण्याचे बळी देतात. ए. के. शेख (पनवेल) यांनी लिहिलेली प्रस्तावना हे त्यांच्या गझलेचे फलित आहे; तर सुप्रसिद्ध गझलकार भीमराव पांचाळे यांनी केलेली पाठराखण त्यांच्या गझलेचे सामर्थ्य आहे. एकंदरीत या संग्रहातील सर्वच गझल या वाचकांना प्रेरणा व प्रोत्साहन बळ देणाऱ्या आहेत. 

कवी रमेश सरकाटे 
गझलसंग्रह ः "आसवांचे हार झाले' 
प्रकाशन ः अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव 
पृष्ठे ः 110, मूल्य ः 125 रुपये 

(लेखक पिंपळनेर येथील कर्मवीर आ. मा. पाटील वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख आहेत.) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com