मानव संसाधन व्यवस्थापक भगवान श्रीकृष्ण

Krishna
Krishna

कृष्णाविषयी बोलताना आपण नेहमी अगदी अरे तुरे आणि स्वतःच्या हक्काचा असा कोणीतरी या हिशोबाने बोलत असतो. लडिवाळ बाळकृष्ण हा गीता सांगणारा योगेश्वर कृष्ण आहे. हा उत्तम व्यवस्थापक आहे. मग व्यवस्थापनाचं यांच्याकडून शिकायचं काय? खरं सांगू, प्रत्येक गोष्ट. जमेल ते आणि जसं जमेल ते.

माहिती आहे, का? कारण; वयाच्या प्रत्येक टप्प्याला कृष्णाला भान होतं कधी काय आणि कसं मॅनेज करायचं ते. लहानपणीचा लडिवाळ कृष्ण तेव्हाही मॅनेज करत होता आणि गोपींना वाटत होतं तो खेळ करतो आहे. असो, तो कृष्ण होता आणि त्याला त्याच्या वेदना आणि त्रास लपवून आयुष्याचा आनंद घेता येत होता; कारण त्याची विवेकबुद्धी जागृत होती. मॅनेजमेंट म्हणजे विवेकबुद्धी. कशाही त्रासाने वा येणाऱ्या आव्हानाने कोलमडून न जाता स्थिर आणि शांतपणे लढा देणे आणि सहीसलामत बाहेर येणे. तो कृष्ण होता म्हणून त्याला काय त्रास नव्हता. अरे, जन्मत: आपल्या आईवडिलांना तो मुकला होता. त्याचं आयुष्य मृत्यूच्या दारावर उभं होतं. त्याच्याच मागे सगळे राक्षस लागलेले. मामा जीव घ्यायला तयार. पुढे जिथे राहत होता तो प्रदेश सोडून प्रजेसकट दुसरीकडे जावं लागलं. सगळं नव्याने. प्रेम जे हवं ते मिळालं नाही. पण, जे मिळालं त्याला प्रेम आणि सन्मान देत आयुष्य काढलं. कोणासाठी लढत होता तो? त्याला तर काहीही मिळणार नव्हतं. तरी शाप आला गांधारीचा तो त्याच्याच पदरी. काय म्हणावं त्या कृष्णाच्या नशिबाला. मानवी पातळीचे सगळे त्या देवाने केले. आणि केले कोणासाठी? शेवटी ठरला तोच लबाड, पळपुटा. म्हणून काय कृष्णाने माघार घेतली?

आपण यावर उत्तर देऊ, तो देव होता. अरे पण तो तुमच्या-आमच्यासारखाच राहिला ना. सामान्य माणसाला दैवी पद्धतीने दाखविले त्याचे आयुष्य, म्हणून त्याने सोसलेले आपल्याला कळणार आहे का? मग हे इतके हाल आणि बोलणे ऐकून कृष्ण करत तरी काय होता? सरळ आणि सोप्या शब्दांत, तो व्यवस्थापन करत होता. कृष्ण माणसं जोडत होता. ज्यांना त्याची साथ एक मित्र , एक मागर्दर्शक म्हणून हवीहवीशी वाटली, त्यांना तो जोडत होता. दुर्योधनाला कृष्ण का लाभला नाही, याचही कारण हेच. दुर्योधनाला कृष्णाची नारायणी सेना हवी होती, ही त्याची स्वतःची निवड होती. तेव्हा शक्ती आणि बुद्धी यांच्या वाटा सहज वेगळ्या झाल्या. आणि जिथे व्यवस्थापनाचा गुरू होता त्याचा विजय झाला. पण, कृष्णाने माझे आणि परके असा भेद इथे केला नाही हे नक्कीच.

मग कृष्णाला इथे HR Manager म्हणजेच मानव संसाधन व्यवस्थापक म्हटल्यास हरकत नाही. ज्या व्यक्तीला माणसे जोडता येतात आणि प्रत्येकाच्या भावना कळतात त्या व्यक्तीला व्यवस्थापनाचा हा भाग नक्कीच कळेल. मलाच इतका त्रास आजपर्यंत सहन करावा लागला, मग आता तुम्हाला का संकटातून बाहेर काढू, असा विचार जर कृष्णाने केला असता, तर गीतेचा जन्म झाला नसता. खरं तर प्रत्येक व्यक्ती एक उत्तम मानव संसाधन व्यवस्थापक होऊ शकतो, कृष्णासारखा नक्कीच नाही; पण त्याच्यापरीने जसा जमेल तसा. त्याला माणसं जोडता येणं महत्त्वाचं.

कोलमडलेल्याला आत्मविश्वास आणि प्रेरणा देता येणे गरजेचं. मग ठिकाण घर असो वा कार्यालय, समोरचा आपल्याला काय वागणूक देईल ते आपल्या हातात आहे. आणि महत्त्वाचा भाग म्हणजे जबाबदारी तेव्हा जास्त वाढते जेव्हा आपण एखाद्या महत्त्वाच्या पदावर असतो. त्या पदाचं महत्त्व कसं जपायचं हेही आपल्यालाच ठरवायचं असतं.

जे मला करता आले नाही ते तुलाही मिळू नये, फक्त माझाच मान सन्मान व्हायला हवा, मी जे देईल तेच घ्या, वाकड्यात जाल, तर मग मी दाखवतो. मी इतकं दिलंय तर मग आता इतकं तर मला मिळायलाच हवं इत्यादी अनेक गोष्टी जर कृष्णाने केल्या असत्या, तर आज कृष्णाला प्रिय म्हणून कदाचित कोणी स्मरलं नसतं. तो परमेश्वर आहे, हे तो विसरला नसला तरी आपल्यासाठी मानवी पातळीच्या सगळ्या गोष्टी त्याने केल्या. आपण कृष्णाच्या गोष्टी करतो, ऐकतो; पण आत्मसात काय करतो? सरळं शब्दांत सांगायचं म्हणजे, कोणत्याही प्रकारचा मोठेपणा त्याच्याबरोबर कर्तव्यही घेऊन येतो, तो वयाच्या आणि अनुभवांच्या प्रत्येक टप्प्याबरोबर आपल्याला कसोटीवर ठेवत असतो. त्या कर्तव्याची जाणीव एकदा का झाली, तर व्यवस्थापनाचा एक टप्पा नक्की गाठता येईल. बघा पटतंय का?
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com