गुजरातमध्ये अडकले 700 मच्छीमार; अन्न-पाण्याअभावी हाल 

गुजरातमध्ये अडकले 700 मच्छीमार
गुजरातमध्ये अडकले 700 मच्छीमार

मुंबई : डहाणू, तलासरी भागातील सुमारे 700 मच्छीमार (खलाशी) समुद्रात अडकले आहेत. ते गुजरातमधील पोरबंदर, सौराष्ट्र, वेरावळ या भागात मच्छीमार मजूर म्हणून गेले होते. कोरोना संकटानंतर बोट मालकांनी त्यांना समुद्री मार्गाने पाठवले आहे. ते गावी परतण्यासाठी बोटींनी गुजरातमधील उंबरगाव येथे पोचले असताना स्थानिकांनी उतरण्यास विरोध केला. त्यामुळे ते नारगोल बंदरावर गेले. तेथेही विरोध झाल्याने ते पुन्हा त्याच राज्यातील मरोलीपासून पाच नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात असून अन्नपाणी नसल्याने त्यांचे हाल सुरू आहेत. त्यामुळे त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे. 

समुद्रात अडकलेल्या मच्छीमारांना गुजरात प्रशासन अन्य ठिकाणी क्वारंटाईन करणार होते, परंतु नंतर उंबरगाव या ठिकाणी गुजरातमधील स्थानिक मच्छीमारांना उतरवून तपासणी केली; मात्र महाराष्ट्रातील मच्छीमारांच्या बाबतीत हात वर केल्याने ते 40 बोटींमध्ये अडकले आहेत. 

दरम्यान, ते मच्छीमार आहेत की अन्य स्थलांतरित नागरिक, याबाबत संभ्रम निर्माण झाल्याने महाराष्ट्रात येण्यापूर्वी त्यांची समुद्रामध्येच तपासणी करून प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशीही मागणी काहींनी केली आहे; तर दुसरीकडे गुजरात प्रशासनाने गुजरातमधील खलाशांची तपासणी करून त्यांची व्यवस्था करत महाराष्ट्रातील खलाशांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे अशी चर्चा आहे. 
याबाबत पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याशी संपर्क झाला नाही. 

आमचे मनोधैर्य खचले 
बोटीवर असलेल्या मच्छीमारांचे मनोधैर्य पार खचले आहे, अशी माहिती बोटीत अडकलेला तलासरी तालुक्‍यातील झाई बोरीगाव येथील मच्छीमार चंद्रकांत बोबा याने "सकाळ'शी बोलताना दिली. बलसाड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रविवारी बोटीतील दमण आणि गुजरातमधील मच्छीमारांना किनाऱ्यावर उतरवण्यात आले. ही प्रक्रिया दुपारी 12 पासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. त्यानंतर तलासरी व डहाणू तालुक्‍यातील महाराष्ट्रातील मच्छीमारांना पुन्हा वेरावळकडे रवाना करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या उदासीनतेमुळे घरी येऊ शकलो नाहीत, अशी खंतही त्याने व्यक्त केली. 

किमान जेवण तरी द्या! 
अडकलेल्या खलाशांना पुन्हा गुजरातमधील मुंद्रा बंदरात नेण्याच्या दृष्टीने गुजरात प्रशासनाने हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे काहींनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गुजरात आणि महाराष्ट्र सरकारने नक्कीच कठोर पावले उचलावीत; मात्र किमान हातावर पोट असणाऱ्या खलाशांच्या जेवणासह राहण्याची योग्य सोय करावी, अशी मागणी मच्छीमार करत आहेत. 
 

नातेवाईक, गावातील अनेक कामगार, मच्छीमार बोटीत अडकले आहेत, परंतु त्यांना दोनवेळच्या जेवणाचीही सोय प्रशासन करत नाही. किमान त्यांना मूळ गावी तरी येऊ द्यावे, अशी आमची गुजरात आणि महाराष्ट्र सरकारकडे मागणी आहे. 
- अर्जुन वांगड, मच्छीमार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com