मुंबई : मुंबईतील आरे कॉलनीतील झाडांची कत्तल आज, सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशानंतर थांबली. कोर्टाने झाडे तोडण्याला स्थगिती दिली आहे. यावरून सोशल मीडियावर सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. या निर्णयामुळे पर्यावरणवाद्यांना दिलासा मिळाल्याचं बोललं जात असलं तरी, 2400 झाडं तोडल्यानंतर आता स्थगितीचा काय उपयोग, असा प्रश्नही उपस्थित केला जातोय.
काय घडले?
मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रोचे कार शेड उभारण्यात येणार आहे. त्यासाठी कॉलनीतील झाडे तोडण्यात येणार होती. त्याला सुरुवातीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इतर पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यात नंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरेही उतरले. पण, मुंबई हायकोर्टाने वृक्षतोडीच्या विरोधात दाखल झालेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्यानंतर गेले तीन दिवस आरे कॉलनीत वृक्षतोड सुरू होती. आरे कॉलनी परिसरात पर्यावरणवाद्यांनी आंदोलनही केले. पण, जमावबंदी आदेश लागू करून, 2400 झाडांची कत्तल केली. सुप्रीम कोर्टाने स्थगितीचा निर्णय देताना, ‘झाडे तोडायला नको हवी होती,’ असे मत व्यक्त केले आहे.
काय आहेत प्रतिक्रिया?
सोशल मीडियावर या निर्णयाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. आता फडणवीस सरकारला तोडलेल्या झाडांच्या दुप्पट झाडे लावण्याची शिक्षा द्या, असे मत काहींनी व्यक्त केले आहे तर, काहींनी झालेले नुकसान कसे भरून काढणार?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. पर्यावरणवाद्यांनी, या निर्णयाबद्दल सुप्रीम कोर्टाचे आभार मानले आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.