Yin Ministry 2024 : करा समाधानी जीवनाची पायाभरणी ; ‘यिन’च्या अधिवेशनात अभिजित पवार यांचा तरुणाईला सल्ला

तरुण वयात प्रवेश करतानाच आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक प्रगतीच्या दृष्टीने विचार आणि आचरण केले पाहिजे. त्यासाठी उपासना, अभ्यास आवश्यक आहे,’’ असे ‘एपी ग्लोबाले’चे संस्थापक आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी आज येथे तरुणाईला सांगितले.
Abhijit Pawar Managing Director of Sakal Media Group
Abhijit Pawar Managing Director of Sakal Media Groupsakal

मुंबई : ‘‘प्रत्येकाच्या सरासरी आयुष्यात उत्पादनक्षम दोन लाख तास असतात. तुम्ही हा वेळ कसा वापरता, यावर तुमचे भविष्य ठरते. तरुण वयात प्रवेश करतानाच आध्यात्मिक, मानसिक आणि शारीरिक प्रगतीच्या दृष्टीने विचार आणि आचरण केले पाहिजे. त्यासाठी उपासना, अभ्यास आवश्यक आहे,’’ असे ‘एपी ग्लोबाले’चे संस्थापक आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी आज येथे तरुणाईला सांगितले.

‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’(यिन)तर्फे आयोजित मंत्रिमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुणाईला त्यांनी सुखी, समाधानी आणि आनंदी जीवनाचा कानमंत्र दिला. ‘भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही स्तरांवर स्वतःच्या विकासाचा विचार तरुणाईने केला पाहिजे,’ असे आवाहन करतानाच त्यांनी आगामी काळात होऊ घातलेल्या अशा स्वरूपाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहनही उपस्थितांना केले.

‘‘महाराष्ट्र संतांची भूमी आहे. या भूमीला संतांचे आशीर्वाद आहेत. अशा महान राष्ट्रात आपण आहोत. आपल्या प्रत्येकात देवत्व आहे. खरे भक्त एकमेकांना नमस्कार करतात. परस्परांमधील देवत्वाला नमस्कार करतात. म्हणजे आपण ‘सामान्य’ नाही; असामान्य आहोत, हे ध्यानात ठेवा,’’ असा सल्ला श्री. पवार यांनी तरुणाईला दिला. ‘‘अध्यात्मात शास्त्र हे अंतर्भूत (इनबिल्ट) आहे. ते अभ्यास करून तपासण्याची गरज आहे. तशी आपली परंपरा आहे. जुन्या शास्त्रांचे पुनर्जीवन झाले पाहिजे. ते करण्याची अथवा अभ्यासाची आपली क्षमता नसेल तर ती वाढवायला हवी,’’ असे सांगतानाच त्यांनी ‘कशालाही नावे ठेवू नका,’ असे आवाहन तरुण-तरुणींना केले. ‘‘पाश्‍चिमात्य विज्ञान शिकून घ्या. आपले ते श्रेष्ठ आणि त्यांचे कनिष्ठ असे काही नाही. आपल्याकडे पूर्वी काहीच नव्हते, हा गैरसमजही नको. जुन्या शास्त्राचे पुनर्जीवन करायचे आहे. त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे,’’ अशा शब्दांत त्यांनी तरुणाईला साद घातली.

रूपकांतून शास्त्राभ्यास

एका प्रश्‍नावर श्री. पवार म्हणाले, ‘‘प्राचीन भारतीय ज्ञान रूपकांमधून सामान्य लोकांसाठी सादर केले गेले. आपल्या शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे. तशी क्षमता नसेल तर ती वाढवायला हवी. देवळांत कासव असते. कासव रूपक आहे. हात लावला की कासव चारही पाय आणि डोके आक्रसून आत घेते. देवळात भक्ताने पाचही इंद्रिये नियंत्रणात ठेवून एकाग्रतेने भक्तीवरच लक्ष केंद्रित करावे, हे शास्त्र कासवाच्या रूपकांतून दिसते. आपली रूपके समजून घेतली पाहिजेत. आपला इतिहास ब्रिटिशांनी लिहिला. एकेकाळी पाश्‍चिमात्य लोक पृथ्वी चपटी असल्याचे सांगत असत. मग ते खरे होते का? भारतीय पंचांग ‘ग्रेगेरियन कॅलेंडर’पेक्षा अचूक असते. संगीतशास्त्र, वेदशास्त्र, ज्योतिषशास्त्र अशा अनेक शास्त्रांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.’’ यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये सुमारे तासभर रंगलेल्या या चर्चेत ‘यिन’च्या तरुण-तरुणींच्या प्रश्‍नांना श्री. पवार यांनी सविस्तर उत्तरे दिली. अध्यात्मापासून ते करिअरपर्यंतच्या प्रश्‍नांचा त्यामध्ये समावेश होता. त्यातील प्रमुख मुद्दे असे :

‘नॅचरल इंटेलिजन्स’

सध्या जगभर कृत्रिम बुद्धिमत्तेचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) बोलबाला आहे, माणसाची कितीही प्रगती झाली तरी जगातील दुःख, अडचणी, युद्धे वाढतच आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता ठीक आहे, पण ‘नॅचरल इंटेलिजन्स’देखील महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘नॅचरल’ आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ यांची सांगड घालायला हवी, असे श्री गुरुजी नेहमी म्हणत असत. मी स्वतः स्थिरस्थावर होऊन पैसा मिळवायला सुरुवात केल्यावरही त्यातून आनंद, सुख मिळत नव्हते, हे ध्यानात आले. मात्र अध्यात्माकडे वळल्यावर त्याचे संतुलन करू शकतो, वेगळा मार्ग मिळू शकतो, हे लक्षात आले. आज आपण शिक्षण घेतो, नोकरी, धंदा, विवाह, लक्ष्मीचा आशीर्वाद हे सारे आपल्याला हवे असते; मात्र सिद्धी प्राप्त झालेले साईबाबांसारखे फकीर हे आसक्तीच्या पलीकडे गेले होते. त्यांच्याकडे घरे, मालमत्ता, संपत्ती काहीही नव्हते. आजच्या व्यावहारिक जगात अशा व्यक्तींना यशस्वी म्हणता येणार नाही.

पण अनेक मंडळी या साईबाबांच्याच पायावर डोके ठेवतात. त्यामुळे या दोघांतील कोण जास्त यशस्वी? हे आपणच ठरवायला हवे. हे अवतारी पुरुष आपल्याला ‘आसक्ती नाही’ असे म्हणू शकतात; पण आपली स्थिती वेगळी आहे. आपल्याला लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समाधानदेखील हवे. स्वतःमधील कौशल्याची जाणीव ठेवून आपल्या क्षमता तपासल्या पाहिजेत.

व्यक्तिमत्त्वाचे चार प्रकार

आपल्याकडे समज-गैरसमज खूप आहेत. पूर्वीच्या चातुर्वर्ण्य या प्रकाराकडे वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघता येईल. समाजात चार व्यक्तिमत्त्वाची माणसे आढळतात.

  • १. ‘टाइप वन’ व्यक्तिमत्त्व असलेले लोक सारखा तर्कशुद्ध विचार करतात, त्यांचे वाचन पुष्कळ असते, ते विश्‍लेषण करतात, त्यांच्याकडे विवेकबुद्धीचा वापर करण्याची क्षमता असते. त्यांच्याकडे भावनिक दृष्टिकोन कमी प्रमाणात असतो. त्यांच्यात भावभावना फार नसतात, मात्र बुद्धी खूप असते.

  • २. ‘टाइप दोन’च्या व्यक्ती पटकन भावनिक होतात. त्यांच्यात बुद्धीवर भर देण्याचे प्रमाण थोडे कमी असते, तर मानापमान आदी गोष्टी त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाच्या असतात.

  • ३. ‘टाइप तीन’च्या व्यक्ती फार भावनिकही नसतात, फार बुद्धिवादीही नसतात. त्या कधी भावनात्मक होतात तर कधी विवेकबुद्धीही वापरतात.

  • ४. ‘टाइप फोर’ प्रकारच्या लोकांमध्ये भावना जास्त नसतात, विवेकबुद्धीही जास्त नसते. प्रत्येक व्यक्तीमध्ये हे चारही प्रकारचे गुण असतात.

दिवसभर आपण वेगवेगळ्या स्थितीत

दिवसभरात काही वेळात आपण कधी पहिल्या, कधी दुसऱ्या, कधी तिसऱ्या तर कधी चौथ्या प्रकारचे असतो. असहाय मनःस्थितीत आपण शूद्र अवस्थेत असतो, ‘राजा’ किंवा ‘सामान्य माणूस’ हे कोणीही या अवस्थेत जाऊ शकतात. ‘टाइप तीन’च्या प्रकारात व्यवसाय करणारे वैश्य असू शकतात. ‘टाइप दोन’च्या प्रकारात पटकन भावनिक होणारे लोक, मानापमान मानणारे क्षत्रिय असू शकतात. ज्ञानोपासना करणारे ब्राह्मणही असू शकतात. आपण स्वतः या व्याख्येनुसार कधी ब्राह्मण, कधी क्षत्रिय, कधी वैश्य तर कधी शूद्र होऊ शकतो. यात जात-धर्म कुठेही येत नाही. जगातील कोणालाही हे लागू होऊ शकते. या मनाच्या अवस्था असतात. यातील आपली जी अवस्था दीर्घकाळ होते, ते आपले व्यक्तिमत्त्व असते. निवडणुकीत मत मागताना समोरचे मतदार सर्व ‘टाइप’चे असतात. पण मत मागणाऱ्याने ‘टाइप दोन’प्रमाणे भावनात्मक भाषण करून मतदारांनाही भावनात्मक बनविले तर ते मत देऊ शकतात. याचा अर्थ यात श्रेष्ठ-कनिष्ठ असा काहीही प्रकार नाही. या अशा सर्व गोष्टी या ‘नॅचरल इंटेलिजन्स’मध्ये येतात. आपल्या धर्मात अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचा चुकीचा अर्थ लोकांनी घेतला आणि काहींनी स्वार्थासाठी त्याचा वेगळा अर्थ लावून गैरप्रकार केला. हे नेमके काय होते? यात काय कल्पना आहेत? हे आपल्याला परत सगळे शोधायचे आहे.

अग्नीने अशुद्धाचा नाश

आपल्याला जेव्हा दुःख होते तेव्हा आपण त्या सर्वशक्तिमान ईश्‍वराला विसरतो. मग सतत नामस्मरण करायचे म्हणजे काय? तर आपण दीपप्रज्वलन करतो तेव्हा आपल्या आतला प्रकाशही उजळला पाहिजे आणि आपण आतल्या अंधारापासून दूर गेलो पाहिजे. सतत तेवणारा दिवा पाहून आपल्याला नामस्मरणाचे विस्मरण होता कामा नये. म्हणजेच त्याची शिकवण आचरणात यावी, आपले बोलणे, विचार तसे व्हावेत याकडे आपले लक्ष हवे. मनात चुकीचा विचार आला तर तो नष्ट झाला पाहिजे. सतत अग्नीच्या उपासनेने अशुद्ध गोष्टी नष्ट झाल्या पाहिजेत, ही जाणीव आपल्याला व्हायली हवी; अन्यथा नुसते श्‍लोक अथवा कर्मकांड करून काहीही फायदा नाही. चारही वेद पाठ असतील, पण आचरणात काही येत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. घरात फक्त कर्मकांड-पांडित्य, पूजा केली आणि बाहेर जाऊन भ्रष्टाचार केला तर त्याचा काहीही फायदा नाही.

आपले शरीर

उत्तम आरोग्यासाठी उत्तम आहार आणि व्यायाम केला तर शारीरिक फायदा होईल. त्यासाठी आयुर्वेद तपासून आचरणात आणा. ‘प्रोटिन’साठी सर्वांनी मांसाहार घेतलाच पाहिजे असे नाही, कारण शेवटी आपण जे खातो त्यानुसारच आपण घडत असतो. त्यानुसार सात्त्विक, तामसी आणि राजसी या गुणांचा विकास होतो. तसाच आपला स्वभावही बनतो. आपल्याला आपला शेवटचा दिवस कसा हवा आहे? आपल्याला कुठे जायचे आहे?... याचाही विचार करा. आपले शरीर आपण कसे विकसित करू, हे ठरवा. त्यासाठी स्वाध्याय केला नाही तर काहीही उपयोग नाही.

सुखाचे चार मार्ग...

आपल्याला मानसिक अवस्था कशी हवी? क्रोध हवा की संतुलित स्थिती हवी... की समत्वभाव हवा... हे ठरवा. अशा चांगल्या मानसिक अवस्थेसाठी ध्यानधारणा आवश्यक आहे. मन इतरत्र भटकू नये, एकाग्र व्हावे यासाठी वर्तमानात जगणे आवश्यक आहे. म्हणून ध्यानधारणा हवी. त्यासाठीचे चार मार्ग असे ः

  • १. ज्योतिध्यानामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. आपल्याला चोवीस तास परम आनंदात राहायचे असेल, तर आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे. आपण कायम या अवस्थेत राहू शकू, त्यासाठी हा ज्ञानमार्ग आहे.

  • २. भक्तिमार्गानुसार श्रद्धा ठेवावी.

  • ३. कर्मयोग म्हणजे सत्कर्म करता येईल

  • ४. हटयोग म्हणजे प्राणायाम करू शकता. कारण आपल्याला राग येतो तेव्हा मनाची स्थिती बिघडते, श्‍वासावरील नियंत्रण जाते. श्‍वासावर नियंत्रण ठेवून हटयोगाने मन स्थिर करता येते‌.

सुखासाठी यातला कोणताही मार्ग निवडता येईल. तरुण वयातच हा निर्णय घ्या. उतारवयात आपल्याला पुष्कळ शारीरिक-मानसिक चिंता वेढून टाकतात...

मुंबईत पादुका दर्शनाची संधी

आपल्याला पुढे काय करायचे आहे? हे ठरवायचे एक चांगली संधी आली आहे. त्यात अर्थार्जनाबरोबर स्वावलंबी होण्याची संधीही मिळेल. यापूर्वीही अशी संधी साधलेल्यांना पुष्कळ फायदा झाला. ही संधी एप्रिलमध्ये मिळेल, त्यासाठी मार्चमध्ये मुंबईत एका कार्यक्रमाला आले पाहिजे. स्वामी समर्थ, गजानन महाराज, साईबाबा, श्री गुरुजी, शेगावचे गजानन महाराज, रामदास स्वामी, निवृत्तिनाथ-ज्ञानदेव, सोपानदेव-मुक्ताबाई यांच्या मूळ पादुका मुंबईत प्रथमच एका व्यासपीठावर आणल्या जाणार आहेत.

हे प्रथमच घडते आहे. त्यात तुम्ही सहभागी होऊन उपासनेच्या मार्गावर जाण्याची प्रतिज्ञा करा. रोज ‘अग्नी’ची उपासना करा, दानधर्म करा, दानाचा अर्थ ‘मोठे दान’ असा नसतो. यज्ञ, ज्ञान, तप यांचा वापर कर्म करताना केला तरच ते कर्म सत्कर्म होते; अन्यथा ती फक्त निर्जीव कृती होते. यासाठी बावन्न आठवड्यांचा अभ्यासक्रम असून, त्या ज्ञानाची उपासना करा, वृक्षारोपण व अन्य काही समाजोपयोगी उपक्रम वर्षभर राबवावेत. यामुळे तुमचे आयुष्य हमखास बदलेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com