अन् कट्टर विरोधक असणाऱ्या अत्रेंनी यशवंतरावांची माफी मागितली

यशवंतराव चव्हाणांना अपत्य नव्हतं आणि अत्रेंनी यावर पातळी सोडून टीका केलेली.
yashwantrao chavan acharya atre
yashwantrao chavan acharya atre sakal

विलीनीकरणाची मागणी करणारे एसटी कर्मचारी आंदोलन आज पुन्हा पेटलं. इतकंच नाही तर आंदोलकांनी मुंबईत पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर दगडफेक आणि चप्पलफेक केली. या धुडगूस प्रकरणानंतर राज्यभरातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आजवर महाराष्ट्राने संस्कारक्षम राजकारण पाहिलं असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण आणि आचार्य अत्रे यांची एक आठवण सांगितली.

कट्टर विरोधक असणाऱ्या अत्रेंनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांची माफी मागितल्याचा हा किस्सा.

गोष्ट आहे संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या धामधुमीतली. तेव्हा मुंबईसह महाराष्ट्र वेगळा झालाच पाहिजे म्हणून जनता उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरली होती. मोरारजी देसाई यांच्या सरकारने रानटीपणे हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न केला. शेकडोजण हुतात्मा झाले पण हे आंदोलन थांबलं नाही. संयुक्त महाराष्ट्र समितीचं नेतृत्व करणाऱ्यांमध्ये आघाडीवर होते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे.

yashwantrao chavan acharya atre
'असे अत्रे पुन्हा न होणे'...

अत्रे महान लेखक पत्रकार नाटककार विडम्बनकार तर होतेच शिवाय त्यांचं वक्तृत्व अमोघ होतं. अत्रेंची तोफ धडाडू लागली की भलेभले विरोधक आडवे व्हायचे. त्यांची मते ठळक होती. काँग्रेस मुंबईसह महाराष्ट्र होण्याच्या विरोधात आहे असं त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं. पंतप्रधानांपासून ते राज्यापर्यंतचे काँग्रेस नेते हे महाराष्ट्र द्रोही आहेत असं त्यांचं थेट म्हणणं असायचं. द्विभाषिक राज्याच्या मुख्यमंत्री पदावर असलेल्या यशवंतराव चव्हाणांना त्यांनी आपल्या मराठा या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून टीकेवर विशेष लक्ष्य केलं.

एकदा कोणता एका पत्रकाराने यशवंतरावांना अत्रेंच्या टीकेवरून प्रश्न विचारला तेव्हा यशवंतराव म्हणाले की मी मराठा वाचत नाही. झालं ! अत्रेंच्या शेपटीवर पाय पडला. त्यांनी यशवंतरावांवर फैरी झाडण्यास सुरवात केली. दुसऱ्या दिवशीच्या अग्रलेखात त्यांनी जोरदार धारेवर धरलं. त्याचा मथळा होता,

'निपुत्रिक यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा'

यशवंतराव चव्हाणांना अपत्य नव्हतं आणि अत्रेंनी यावर पातळी सोडून टीका केलेली. हा अग्रलेख खूप गाजला. राज्यभरातून प्रतिक्रिया आल्या. सगळ्यांचं लक्ष यशवंतराव काय उत्तर देणार याच्याकडे होतं. यशवंतरावांनी आपला संयम सोडला नाही.

yashwantrao chavan acharya atre
''आईच्या पाठोपाठ माझ्या जीवनाला आकार आणि आशय देणारी माझी प्रिय पत्‍नी...''

त्यांनी अत्रेंना फोन लावला आणि म्हणाले, “अत्रे साहेब तुम्ही मला निपुत्रिक म्हणता पण अहो मी निपुत्रिक नाही. `चले जाव` चळवळीवेळी मला अटक करण्यासाठी पोलिसांनी माझ्या घरावर धाड टाकली होती. त्यावेळी माझी पत्नी वेणू गरोदर होती. इंग्रजांच्या हाताला मी लागलो नाही. त्याचा राग त्यांनी माझ्या पत्नीवर म्हणजेच वेणूवर काढला. त्यांनी वेणूच्या पोटावर काठीने मारलं. या सगळ्यात तिच्या पोटात असलेला गर्भ पडला. तसंच गर्भशयाला देखील दुखापत झाली आणि त्याचमुळे पुन्हा मला मुल होण्यात अडचण आली.``

आचार्य अत्रें यांना हे ऐकून धक्काच बसला. आपल्या हातून मोठी चूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी यशवंतराव चव्हाणांची माफी तर मागितलीच. शिवाय यशवंतरावांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्नी पुढे म्हणजेच वेणूताईसमोर देखील पश्चाताप व्यक्त केला. इतकंच नाही तर पुढे जाहीरसभेत त्यांनी यशवंतरावांची माफी मागितली.

पुढे विधानसभा निवडणुका झाल्या. पश्चिम महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समितीकडून उभे राहिलेल्या उमेदवारांनी दिग्गज काँग्रेस नेत्यांना धूळ चारली. अपवाद फक्त यशवंतराव चव्हाणांचा. अत्रेंच्या त्या टिकेनंतर कराडची जनता यशवंतरावांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती. आणि त्यांच्या सुसंस्कृत राजकारणाचा परिणाम काँग्रेस विरोधाची मोठी लाट असतानाही यशवंतराव मोठ्या फरकाने विजयी झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com