भीमा कोरेगाव प्रकरण आणखी काही जण रडारवर : मुख्यमंत्री 

भीमा कोरेगाव प्रकरण आणखी काही जण रडारवर : मुख्यमंत्री 

मुंबई: भीमा कोरेगावप्रकरणी आणखी काही जण रडारवर असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सध्या या प्रकरणातील मानवाधिकार कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांनी अटक केल्याच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

भीमा कोरेगावप्रकरणी आतापर्यंत ज्यांना अटक करण्यात आली त्यांच्याविरोधात भक्कम पुरावे आहेत. अटक करण्यात आलेले संत नाहीत. देशामध्ये यांच्याकडून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. ते भीमा कोरेगाव दंगलीत सहभागी नसतील; पण तशी परिस्थिती निर्माण करण्यामध्ये त्यांचा हात असू शकतो, अशी शंका मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केली. दरम्यान, सनातन संस्थेवर बंदीचा प्रस्ताव अगोदरच केंद्राकडे गेलेला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. केंद्राने आणखी माहिती मागवली आहे. आम्ही केंद्राला सहकार्य करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 

मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागेल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. धनगर आरक्षणासाठी "टिस'चा (टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स) अहवाल सरकारला प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. 

आम्हीच निवडून येणार 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप 2019 ची लोकसभा निवडणूक आणि राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकाही जिंकेल. आम्ही फक्त 2014 च्या निवडणुकांची पुनरावृत्तीच करणार नाही, तर त्यापेक्षा चांगली कामगिरी करू, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

जलयुक्त शिवारचे समर्थन 
जलयुक्त शिवार योजना फोल ठरली असल्याच्या वृत्ताचे मुख्यमंत्र्यांनी खंडन केले. राज्यात काही वर्षांमध्ये कृषी उत्पादन वाढले असून, ते जलयुक्त शिवारचे यश आहे. 2013-14 मध्ये 124 टक्के पाऊस पडूनही उत्पादन 137 लाख मेट्रिक टन होते. 2016-17 मध्ये 97 टक्के पाऊस पडला आणि उत्पादन 223 लाख मेट्रिक टन, तर 2017-18 मध्ये पाऊस 84 टक्के पडला आणि उत्पादन 180 लाख मेट्रिक टन झाले, असे सांगत जलयुक्त शिवारने फायदा झाल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 

सिंचन घोटाळा 
राज्यातील सिंचन प्रकल्पाची कामे वेगाने सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 40 लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाचे काम डिसेंबर 2019 पर्यंत पूर्ण होईल. सिंचन घोटाळ्याची चौकशी कोर्टाकडून सुरू असून लवकरच सत्य समोर येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com