
मुंबई: राज्यात गाजत असलेल्या परमबीर सिंह विरूद्ध अनिल देशमुख या प्रकरणात अखेर आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. या आरोपांवरून आज उच्च न्यायालयाने गृहमंत्र्यांच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले. या आदेशानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्याआधी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्याच मुद्द्यावरून भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेसला टोला लगावला.
"शिवसेना झालं, राष्ट्रवादी झालं, आता राज्यातील महाआघाडी सरकारमधील किमान समान कार्यक्रम म्हणून काँग्रेसलादेखील तिसऱ्या विकेटसाठी संधी मिळायला हवी. काँग्रेसवर अन्याय होता कामा नये", असं ट्वीट करत केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला टोला लगावला.
परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाबाबत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर लगेचच केशव उपाध्ये यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. 'परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपाबाबत सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. आता तरी अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे', असं ट्वीट त्यांनी केलं होते.
अनिल देशमुखांच्या राजीनाम्यावर देवेंद्र फडणवीस म्हणतात...
"गृहमंत्री देशमुख यांनी तत्काळ राजीनामा द्यायला हवा होता. आता गृहमंत्र्यांचा राजीनामा घेऊन झाला तरीही कोडं एकच आहे की महाराष्ट्रात इतक्या भयावह घटना घडल्या, कधी नव्हे ते गृहमंत्र्यांवर आणि पोलीस अधिकाऱ्यांवर वाईट आरोप लागले असे असतानाही राज्याचे मुख्यमत्री अद्यापही यावर काहीच का बोलत नाहीत? सरकार विचित्र स्थितीत असताना त्यांचे मौन अस्वस्थ करणारे आहे. 'वाझे लादेन आहे का, ही मुख्यंत्र्यांची शेवटची प्रतिक्रिया मला आठवते आहे. त्यानंतर अद्यापही मुख्यमंत्री का बोलत नाहीत?", असा सवाल फडणवीस यांनी केला.
उद्धव ठाकरेंना नारायण राणेंचा सणसणीत टोला
राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी सोमवारी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. या मुद्द्यावर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असल्याने त्यांनी या साऱ्या प्रकरणाची जबाबदारी घ्यायली हवी का? प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. या प्रश्नावर नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना सणसणीत टोला लगावला. " मुख्यमंत्र्यांच्या घरातील सगळे कोरोना पॉझिटिव्ह... त्यांनी कुटुंबाची तरी काय जबाबदारी पाळली?", असा टोला त्यांनी लगावला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.