बेधुंद कारभार, भांबावलेलं सरकार अन् बरंच काही...; वाचा काय म्हणाले प्रवीण दरेकर

pravin-darekar-Uddhav-T
pravin-darekar-Uddhav-T

मुंबई: महाराष्ट्रात सध्या अनेक खळबळजनक गोष्टी घडताना दिसत आहेत. या घडामोडींना दररोज नवीन वळण मिळताना दिसत आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला सध्या सरकार विरूद्ध प्रशासन असा रंग चढल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांनी या साऱ्या प्रकारानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी सोमवारी सकाळी केली. त्यानंतर संध्याकाळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सरकारचा यथेच्छ समाचार घेतला.

"सध्या घडत असलेल्या घडामोडींमध्ये अनिल देशमुख किंवा परमबीर सिंह हे महत्त्वाचे नाहीत, तर एका पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने गृहमंत्र्यांवर केलेले आरोप हे अधिक महत्त्वाचे आहेत. हे आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत. आधी पोलीस सेवेतील रश्मी शुक्ला यांनी बदलीमागे असणाऱ्या भ्रष्टाचाराबाबत एक याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी आपल्या वेदना स्पष्टपणे मांडल्या आहेत. आता परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. हळूहळू पोलीस दलातील असंतोष बाहेर येऊ लागला आहे. सरकारचा अशा प्रकारचा बेधुंद कारभार राज्यात याआधी कधीही झालेला नाही", अशी जहरी टीका भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

"केवळ भाजपची मागणी आहे म्हणून राज्यपाल राज्याच्या परिस्थितीचा अहवाल राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवतील असं नाही. सध्या राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कोणाही सुरक्षित नाही. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. गृहमंत्री १०० कोटींचे टार्गेट देत असतील तर सरकारला सत्तेत राहायचा नैतिक अधिकार नाही. राष्ट्रपती या साऱ्या गोष्टींची माहिती कायमच घेत असतात. त्यांना असलेल्या अधिकारांचा योग्य तो वापर त्यांच्याकडून केला जाईल", अशी खात्री दरेकरांनी व्यक्त केली.

मुंबईतील ताज्या घडामोडींसाठी क्लिक करा.
 
"मी राष्ट्रपती राजवटीची मागणी केलेली नाही. परमबीर सिंह जेव्हा पोलीस आयुक्त होते तेव्हा त्यांच्या कर्तृत्वाचे गोडवे गायले जात होते. आणि आता त्यांनी पत्र लिहिल्यावर अचानक परमबीर सिंह हे भाजपचे लाडके असल्याचा कांगावा केला जात आहे. सध्याचं हे सरकार भांबावलेलं सरकार आहे. तीन पक्षांचं सरकार कसं टिकवायचं? हाच एकमेव अजेंडा यांच्यापुढे आहे. राज्यात काय सुरू आहे? कोरोना, पोलीस दल, शेतकरी यांबद्दल काय करण्याची गरज आहे? याचे निर्णय या सरकारला घ्यायचे नाही. दीड वर्षांपासून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी हे सरकार चाचपडत आहे. असं सरकार महाराष्ट्रात इतिहासात कधीच झालं नाही", असं रोखठोक मत त्यांनी व्यक्त केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com