
मुंबई : खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना त्यांच्या मुंबईतील निवासस्थानावरुन पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. यावेळी घोषणाबाजी करताना रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवीगाळ केली. यामुळं राणांविरोधात महाविकास आघाडीतील नेते आक्रमक झाले आहेत. या प्रकारामुळं राणा अडचणीत येण्याची शक्यता आहे. (CM Uddhav Thackeray was insulted by Ravi Rana when he was taken into police custody)
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार ते मातोश्रीकडे रवानाही झाले. परंतू शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी करुन त्यांना अडवल्यानं ते मातोश्रीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. दरम्यान, पोलिसांनी त्यांना कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कृत्य न करण्याचं आवाहन केलं. यानंतर राणा दाम्पत्यानं माघार घेत आपला कार्यक्रम थांबवत असल्याचं जाहीर केलं आणि आपल्या मुंबईतील निवासस्थानी परतले.
पण यानंतरही राणा दाम्पत्यानं माफी मागावी यासाठी युवासेनेचे अध्यक्ष वरुण सरदेसाई आणि शिवसेना समर्थकांनी राणांच्या घराबाहेर घेराव घातला. तसेच माफी मागितल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका घेतली. दरम्यान, राणा दाम्पत्याविरोधात खार पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर पोलीस राणा यांच्या घरी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतलं. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं. इथं पोहोचल्यानंतर पायऱ्यांवरुन वर जाताना नवनीत आणि रवी राणा या दाम्पत्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेने विरोधात घोषणाबाजी करताना शिवीगाळ केली. माध्यमांच्या कॅमेरॅत हा सर्व प्रकार कैद झाल्यानं आता महाविकास आघाडीचे नेते आक्रमक झाले असून रवी राणा यांच्याविरोधात मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत.
राणा दाम्पत्याचे संस्कार यामुळं समोर आले - पेडणेकर
शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुळात यांचे संस्कार आणि मूळ विद्रुप चेहरा बाहेर आला. हेच का तुमचे संस्कार. तुम्ही मुळात अमरावतीचे खासदार-आमदार तुम्ही अपक्ष तुमचा काय संबंध की मातोश्रीवर आम्ही जाणार तिथं जाऊनचं आम्ही हनुमान चालीसा. मुंबई येऊन ही नाटकं करायची काय गरज होती? मुंबईत आल्यानंतर आम्ही मातोश्रीवर जाणारच ही दादागिरी करायला तुम्हाला कोणी सांगितलं. शिवसेनेकडून यांच्याविरोधात तक्रार दाखल होऊ शकते.
ही लोकशाहीच्या मुळावर येणारी लोकं - अरविंद सावंत
अरविंद सावंत म्हणाले, आता तरी देशाला कळू दे की यांचं चरित्र काय आहे? हे खूपच घाणेरडे लोक आहेत. नवनीत राणा खोटं जातप्रमाणपत्र देऊन निवडून आल्या. रवी राणा निवडणुकीत सर्वात जास्त खर्च करुन निवडून आले. सिद्ध झालेल्या गोष्टीवर कारवाई करायला निवडणूक आयोगाला तीन वर्षे कशी लागतात. ही लोकशाहीच्या मुळावर येणारी लोकं आहेत. ज्यांच्यात मुळातचं खोटेपणा आहे ते पुढे काय करणार? हे लोक आम्हाला हिंदुत्व आणि हनुमान चालिसा काय शिकवणार?
राणांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करायला हवं - गुलाबराव पाटील
गुलाबराव पाटील म्हणाले, लोकशाहीत अशा पद्धतीचं चित्र मी २५-३० वर्षांच्या काळात पहिल्यांदाच बघतो आहे. एक खासदार आणि आमदार मुख्यमंत्र्यांच्या दारावर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार हे तर मी देशात कुठेचं पाहिलं नाही. असा आग्रह धरुन महाराष्ट्राच महाराष्ट्राचं वातावरण बिघडवयाचं. यांना ठाण्याच्या रुग्णालयात दाखल करायला हवं. यांच्या भ्रष्ट बुद्धीमागे कोणीतरी आहे याचा तपास पोलिसांनी करावं. मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी तो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे एवढी अक्कल त्यांना असायला हवी होती.
राणा दाम्पत्याच्या सर्व विधानांची पोलिसांकडून होणार चौकशी
राणा दाम्पत्याच्या सर्व विधानांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. राणा दाम्पत्याकडून गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आता पोलीस त्यांनी केलेल्या सर्व प्रकारच्या भाषण, बाईट, मुलाखती यांचा तपास करणार आहेत. मुंबई पोलिसांना संशय आहे की त्यांनी उल्लेख केला होता की त्यांनी आपल्या समर्थकांना मुंबई येण्याचं आवाहन केलं होतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.