काँग्रेस नेत्यानेच मागितला देशमुखांचा राजीनामा, त्यावर सचिन सावंत म्हणतात... 

sachin-sawant.jpg
sachin-sawant.jpg

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला हॉटेल, पब, रेस्टॉरंटसकडून १०० कोटींची वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप पत्रातून केला आहे. या लेटरबॉम्बनंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपा, मनसेने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. हे पत्र समोर आल्यानंतर काँग्रेसचे नेते राशिद अल्वी यांनी सुद्धा अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीसोबत काँग्रेस सुद्धा सरकारमध्ये सहभागी आहे. 

काँग्रेस नेत्यानेच केलेल्या राजीनाम्याच्या मागणीमुळे महाविकास आघाडीत विसंवाद निर्माण झाल्याची चर्चा सुरु झाली. काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी शनिवारी अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली. काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, असे अल्वी म्हणाले. त्यांनी परमबीर सिंह यांच्यावर सुद्धा टीका केली. परमबीर सिंह आज बदली झाल्यानंतर का बोलत आहेत? असा सवाल त्यांनी केला. 

दरम्यान आता महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राशिद अल्वी यांच्या विधानावर काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. "अनेकजण व्यक्तीगत पातळीवर कुठल्याही विषयावर स्वत:च मत मांडत असतात. ते त्यांचं व्यक्तीगत मत असतं. फक्त पक्षाध्यक्ष आणि पक्षाच्या प्रवक्त्याने मांडलेली भूमिका अधिकृत समजली पाहिजे. राशिद अल्वी हे पक्षाचे अधिकृत प्रवक्ते नाहीत" असे सचिन सावंत यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे. एकप्रकारे त्यांनी राशिद अल्वी यांनी केलेली राजीनाम्याची मागणी ही काँग्रेसची अधिकृत भूमिका नाही, हे स्पष्ट केलं. 

संजय राऊत काय म्हणाले?
"सरकार चौकशीचं आव्हान स्वीकारायला तयार आहे. मग तुम्ही सारखे राजीनाम्याबद्दल का बोलता? राजीनामा घेणं  हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो. विरोधी पक्षांनी ज्या प्रकारच्या आरोपांचा धुरळ उडवलेला आहे, त्यात संभ्रम निर्माण करण्यात ते यशस्वी झालेत" असे संजय राऊत म्हणाले. 

"सरकारच्या प्रतिमेची आम्हाला जास्त चिंता आहे. सरकारच्या प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्न करतय, परमबीर सिंह यांचं पत्र हा पुरावा होऊ शकत नाही" असे राऊत म्हणाले. संजय राठोड यांचा राजीनामा घेतला, मग अनिल देशमुख यांचा राजीनामा का नाही? या पत्रकारांच्या प्रश्नावर राऊत म्हणाले की, "संजय राठोड आणि अनिल देशमुख प्रकरणाची तुलना करु नका. संजय राठोड यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. मुलीच्या कुटुबीयांनी कुठलेही आरोप केलेले नाहीत."  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com