हनुमान चालिसाआडून विरोधी पक्षांचे सरकारविरोधात कारस्थान

मुंबई पोलिसांचा सत्र न्यायालयात थेट दावा
Ravi Rana and Navneet Rana
Ravi Rana and Navneet RanaSakal

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’निवासस्थानी हनुमान चालिसा म्हणण्याबाबत आव्हान देणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जाला राज्य सरकारने आज तीव्र विरोध केला. हनुमान चालिसाच्या आडून राणा आणि विरोधी पक्षांनी संगनमताने महाविकास आघाडी सरकारविरोधात केलेले हे कटकारस्थान आहे, असा थेट दावा पोलिसांनी केला. दरम्यान, सदर याचिकेवर पुढील सुनावणी उद्या (ता. ३०) होणार आहे.

राजद्रोहाच्या आरोपाखाली सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा पती-पत्नीने मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. त्यांच्या अर्जावर विशेष न्या. आर. एन. रोकडे यांनी यांच्यापुढे सुनावणी झाली. या वेळी राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला पोलिसांनी अठरा पानी प्रतिज्ञापत्रात विरोध केला. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या ‘मातोश्री’निवासस्थानी हनुमान चालिसा म्हणण्याचे हे वरकरणी छोटे आव्हान दिसत असले, तरी त्याआडून ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारविरोधात राणा दाम्पत्य आणि विरोधी पक्षांनी मोठा कट आखला होता, असे पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

भाजप आणि विरोधी राजकीय पक्ष ठाकरे सरकारला हिंदूविरोधक आणि हिंदुत्ववादी नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच सध्याचे वातावरण हिंदूधर्मीयांसाठी योग्य नसल्याचे आणि हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केले जात आहेत, असा आरोप पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात केला आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आज पोलिसांच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर केले. राणा पती-पत्नी मूळचे अमरावतीचे असल्याने त्यांना जामीन मंजूर केल्यास ते तपासासाठी उपलब्ध होणार नाही आणि ते साक्षीपुरावे प्रभावित करतील, असा दावा पोलिसांनी केला.

दरम्यान, राणा दाम्पत्याला घरचे जेवण देण्याची मागणी सत्र न्यायालयाने नामंजूर केली. कारागृहात सर्वांना चांगला आणि सकस आहार दिला जातो, असे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने राणा यांचा घरचे जेवण देण्याचा अर्ज फेटाळला.

सत्ता न मिळाल्याने भाजपचा डाव

प्रतिज्ञापत्रात राज्य सरकारने भाजपवर खरमरीत टीका केली. भाजपकडून सातत्याने सरकारी धोरणांवर टीका केली जात आहे. शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजप लक्ष्य करत आहे. शिवसेनेसह युती करून सत्ता स्थापन करता न आल्यामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह शिवसेनेचे महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केल्यामुळे भाजपकडून हा प्रकार सुरू असल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

राजद्रोहाचा आरोप योग्य

राज्यातील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणत सरकारला आव्हान देत जनजीवन विस्कळित करण्याचा कट राणा दाम्पत्याने आखला होता. त्यामुळे त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला. धार्मिक तेढ निर्माण करणारे वर्तन राणा दाम्पत्याने केले आहे. ज्या पद्धतीने अमरावतीहून मुंबईमध्ये आले, त्यावरून त्यांना नागरिकांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था धोक्यात आणायची होती, हे स्पष्ट होते, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com