शहापूरमध्ये 107 गावांतील पिके उद्‌ध्वस्त; 3 हजार शेतकऱ्यांना फटका

शहापूरमध्ये 107 गावांतील पिके उद्‌ध्वस्त; 3 हजार शेतकऱ्यांना फटका

खर्डी : गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे शहापूर तालुक्‍यातील तब्बल 797 हेक्‍टर शेतीखालील क्षेत्र बाधित झाले आहे; तसेच त्यात आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. पावसामुळे तालुक्‍यातील 107 गावांतील भातपिके बाधित झाली असून सुमारे 3 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसल्याचा अंदाच शासनाच्या प्राथमिक सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे. 

वादळी पावसामुळे बळीराजाचे कापलेल्या पिकाबरोबरच शेतातील उभे पीकही वाहून गेले आहे; तर उर्वरित पाण्यात भिजून सडून गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. संपूर्ण मेहनत वाया गेल्याने व हाती काहीच शिल्लक न राहिल्याने बळीराजासमोर आता उपासमारीचे संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मागणी होत आहे. याची तातडीने दखल घेत शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी महसूल, कृषी आणि पंचायत समिती विभागाच्या अधिकाऱ्यांना भातपिकाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महसूल विभागाचे पंचनामे करण्याचे काम शनिवारपासून (ता. 17) सुरू केले आहे. 

पंचनामे करण्यास सुरुवात 
शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शहापूरच्या तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी तालुक्‍यातील 200 हून अधिक गावांचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी व पंचायत समिती या विभागांना दिले आहेत. त्यानुसार महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, तलाठी यांनी तालुक्‍यात प्रत्यक्ष शेतांमध्ये जात नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केल्याचे तहसीलदारांनी सांगितले. 
-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com