Dombivali News : एमआयडीसी नाल्यातील पाण्याला निळा रंग; केमिकल मिश्रित पाण्याला उग्र दर्प, स्थानिक हैराण

डोंबिवली औद्योगिक विभाग फेज 2 मधील नाल्यात रासायनिक कंपन्यांतून केमिकल मिश्रीत पाणी सोडले जात आहे.
blue water in drain dombivali
blue water in drain dombivalisakal

डोंबिवली - डोंबिवली औद्योगिक विभाग फेज 2 मधील नाल्यात रासायनिक कंपन्यांतून केमिकल मिश्रीत पाणी सोडले जात आहे. या रासायनिक पाण्यामुळे येथील नाल्याला निळा रंग आला असून त्या पाण्याच्या उग्र दर्पाने परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत.

रासायनिक कंपन्यांतून अनेकदा प्रक्रीया न करताच सांडपाणी नाल्यात सोडले जात असून यावर प्रशासनाचा अंकुश नसल्याने रहिवाशांना देखील कोणी वाली राहीला नसल्याचे नागरिक म्हणत आहेत. यापूर्वी देखील रासायनिक सांडपाण्यामुळे नाल्यातील पाण्याला हिरवा, निळा, लाल रंग आल्याचे पहायला मिळाले आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा कधी निघणार असा सवाल नागरिक करत आहेत.

गेल्या एक दोन दिवसांपासून निळ्या रंगाचे रसायन मिश्रित पाणी सोडले जात आहे. सकाळ किंवा रात्रीच्या वेळेस हे पाणी कारखान्यांतून नाल्यात सोडले जात असून या पाण्याच्या उग्र दर्पाने स्थानिक रहिवासी हैराण झाले आहेत. राज्य शासनाने 156 रासायनिक कारखाने स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला असला तरी अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याने प्रशासन नारिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप रहिवासी करतात.

डोंबिवली एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या वायूमुळे, तसेच रसायन मिश्रित पाण्यामुळे निवासी भागातील रहिवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्थानिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी राज्य शासनाने औद्योगिक विभागातील 156 रासायनिक कारखाने पाताळगंगा येथे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला, मात्र त्याप्रकरणी कारवाई शून्य असल्याने स्थानिकांना आजही या समस्यांचा सामना करावा लागत आहे.

या प्रदुषणामुळे शहरातील अंतर्गत नाल्यांना हिरवा, निळा, पांढरा, नारंगी असे अनेक रंग प्राप्त होऊन त्यांच्या उग्र दर्पामुळे डोळे चुरचुरणे, मळमळ, उलट्या यांसारखे त्रास कायम सतावत आहेत. खुद्द तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या परिसराची पाहणी करुन येथील समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर राज्य शासनाने कारखाने स्थलांतराचा निर्णय घेतला होता.

मात्र यावर अंमलबजावणी का केली जात नाही. रासायनिक कारखाने स्थलांतरीत करण्याचे निर्णय घेऊन केवळ नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे, प्रत्यक्ष कारवाई न करता राज्य शासन कारखानदारांना सूट दिली जात असल्याचा आरोप देखील स्थानिक नागरिक करत आहेत.

नाल्यातील पाण्याचा रंग बदलला असल्याची बाब उघड उघड येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात येते. मात्र याकडे प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष जाऊ नये ही बाब आश्चर्यकारक आहे. या पाण्याला उर्ग्र दर्प येत असून यामुळे स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. रात्रीच्या वेळेस हा वास वाढत असल्याची तक्रार नागरिक करतात.

निवासी विभागाच्या लगत असलेल्या नाल्यात मिळ्या रंगाचे केमिकल युक्त पाणी कंपनीकडून सोडण्यात आले आहे. यामुळे दुर्गंधीचा सामना येथील रहिवासी करत आहेत. या दुर्गंधीने श्वास घेणे सुद्धा नकोसे वाटत आहे. या अगोदर ही लाल, हिरवे केमिकल युक्त पाणी सोडण्यात आले होते. स्थानिक लोकांच्या जीवाशी खेळवण्याचा प्रकार सर्रास कंपन्या करत आहेत.

यावर कहर म्हणजे प्रदुषण नियंत्रण मंडळ डोळयावर झापड लावून बसले आहे. या संदर्भात एमआयडीसीला रहिवाशांना कोणीच वाली नाही आहे का? या पुढे असेच केमिकल युक्त पाणी नाल्यात दिसल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे विभाग अध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com