
ठाणे : ठाणे शहरात धुळीचे प्रमाण कसे आहे, त्याची माहिती ठाणेकरांना होण्यासाठी महापालिकेने शहरात 54 ठिकाणी बसवलेली धूळ नियंत्रण यंत्रणाच सध्या धूळ खात पडली आहे. "पीपीपी' तत्त्वावर ही यंत्रणा कार्यरत होती. मात्र मागील वर्षभरापासून ती कार्यरत नाही. विशेष म्हणजे ठेकेदाराने जाहिरातीपोटी मलिदा लादून पालिकेचे नुकसान केल्याचेही उघड झाले आहे. त्यामुळे आता संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आल्याची माहिती गुरुवारी झालेल्या महासभेत प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत देण्यात आली.
गुरुवारी झालेल्या महासभेत प्रश्नोत्तरांच्या तासाला नगरसेविका नंदिनी विचारे यांनी शहरात बसवलेली धूळ नियंत्रण यंत्रे सुरू आहेत का? त्यांची सध्याची परिस्थिती काय आहे, याचा आढावा मागितला. परंतु संबंधित यंत्रणा बंद असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण खात्यामार्फत देण्यात येऊन संबंधितांचा ठेका रद्द करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
ठाणे महापालिकेने शहरातील 12 प्रमुख चौकांत 54 धूळ नियंत्रण यंत्रे तीन वर्षांपूर्वी बसविली होती. ठाणे स्थानक परिसर, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी या ठिकाणी ही यंत्रे बसवली होती. याशिवाय, शहराच्या विविध भागात आणखी दीडशे धूळ नियंत्रण यंत्रे बसविण्याची घोषणा महापालिकेने केली होती. मात्र, प्रत्यक्षात ही यंत्रे अद्याप बसविण्यात आलेली नसल्यामुळे पालिकेची घोषणा हवेत विरल्याचे चित्र होते. असे असतानाच गेल्या वर्षाभरापासून शहरातील 54 धूळ नियंत्रण यंत्रे बंद असल्याची बाब महासभेत उघडकीस आली.
पीपीपी तत्त्वावर बसविण्यात आलेल्या या यंत्रणेसाठी ठेकेदाराला जाहिरातीचे हक्क देण्यात आले होते. देखभाल दुरुस्ती अभावामुळे ही यंत्रे बंद पडली असली तरी ठेकेदार मात्र जाहिरातीच्या हक्कातून पैसे कमावत होता, असा मुद्दा नगरसेवकांनी सभागृहात उपस्थित केला. त्यावर प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. वारंवार सूचना करूनही संबंधित ठेकेदाराकडून दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
आता मुंबईतील "वायू' ठाण्यात!
मानवी आरोग्यास हानीकारक असलेले हवेतील 25 मायक्रॉन आकारमानाचे कण शोषून शुद्ध हवा बाहेर सोडण्याचे काम धूळ नियंत्रण यंत्र करीत होते. त्यासाठी या यंत्रात विशिष्ट प्रकारचे पंखे बसविण्यात आले होते. पाच फूट उंच आणि अडीच फूट रुंदीची ही यंत्रे देखभाल दुरुस्ती अभावी बंद पडल्यानंतर आता मुंबईच्या धर्तीवर "वायु' नावाची यंत्रे बसविण्यासाठी पालिकेने चाचपणी सुरू केली आहे. ही यंत्रे धूलिकण आणि वायू प्रदुषण रोखतात, अशी माहिती सूत्रांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.