
पालकमंत्री, खासदार उल्हासनगरकरांच्या अभयसाठी धावले; थकबाकी भरण्याचे आवाहन
उल्हासनगर : महासभेने मंजूर केलेला अभययोजना (Abhay yojana) लागू करण्याचा ठराव पालिकेने (Ulhasnagar municipal corporation) विखंडीत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठवला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (dr shrikant shinde) यांच्या मागणीनुसार नगरविकास विभागाने ठराव फेटाळला असून नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) एका महिन्यासाठी अभययोजना सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ.राजा दयानिधी यांना दिले आहेत. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, नगरसेवक अरुण आशान यांनी ही माहिती पत्रकारांना दिली आहे.
हेही वाचा: पालघर जिल्ह्यातील दोन तालुक्यांना अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे केलेल्या प्रयत्नांना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद दिल्यामुळे अभययोजने अंतर्गत थकबाकी भरण्याची संधी उल्हासनगरकरांना मिळाली आहे.या संधीचे सोने करा असे आवाहन महापौर लिलाबाई आशान यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना शहरप्रमुख नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी अभययोजना लागू करण्याचा अशासकीय ठराव महासभेत आणला होता.तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. मात्र आयुक्त डॉ.दयानिधी यांनी आडमुठे धोरण घेऊन हा ठराव विखंडीत करण्यासाठी शासनाकडे पाठवला होता.
असे असताना योजनेच्या प्रतीक्षेत थकबाकी भरण्यासाठी विशेषतः बडे आसामी,व्यापारी पुढे येत नव्हते.त्यामुळे अधिकारी,कर्मचाऱ्यांचा पगार देण्याची पंचाईत पालिकेकडे उभी राहिली होती.तर दुसरीकडे भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर दबाव नसल्याची टीका केली होती. दोन दिवसांपूर्वी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे उल्हासनगरात आले असता,अभययोजना सुरू करा आम्ही थकबाकी भरण्यासाठी पुढाकार घेणार असे साकडे व्यापाऱ्यांनी घातले होते.डॉ.शिंदे यांनी व्यापाऱ्यांची ही समस्या नगरविकास व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली.
हेही वाचा: मृत्यू कोविडनेच झालेत का? दोनशे मृत व्यक्तींच्या अहवालाचे करणार विश्लेषण
नगरसेवक अरुण आशान,कलवंतसिंग सोहता यांनी मंत्रालयात जाऊन एकनाथ शिंदे यांना आकडेवारी दाखवल्यावर शिंदे यांनी आयुक्त डॉ. दयानिधी यांचा अभययोजना विखंडीत करण्याचा ठराव फेटाळला असून एका महिन्यासाठी योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
"पालिकेची वसूली अब तक 56"
अभययोजना लागू होणार नाही असे स्पष्ट करणाऱ्या मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त प्रियंका राजपूत यांच्या टीमने आतापर्यंत 56 कोटींची वसूली केलेली आहे.65 हजार करबुडव्यांना वॉरंट बजावण्यात आलेले असून वसुलीसाठी 72 मालमत्ता सील करण्यात आल्या आहेत.त्यांच्या लिलावांची प्रक्रिया हाताळली जाणार होती. पण आता खासदार डॉ. शिंदे यांच्या मागणीनुसार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका महिन्यासाठी अभय योजना लागू करण्याचे आदेश दिल्याने 65 हजार करबुडवे, सील करण्यात आलेले 72 प्रॉपर्टी धारक यांचा जीव भांड्यात पडला असून त्यांनी योजने अंतर्गत संपूर्ण थकबाकी भरल्यास पालिका यंदा वसुलीचा 100 कोटींच्या वरचा उच्चांक गाठणार असे चित्र निर्माण झाले आहे.
Web Title: Eknath Shinde Gives Order To Ulhasnagar Municipal Corporation Authorities To Start Abhay Yojana For One Month
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..