आंतराष्ट्रीय आणि आंतरदेशीय पर्यंटन थंडावले, हॉटेल उघडूनही महिनाभरात केवळ 10 टक्के ग्राहकांची नोंद

Hotel
Hotel

मुंबई : सध्या काही ठिकाणी अजूनही लाॅकडाऊन सुरु असल्याकारणाने आंतराष्ट्रीय आणि आंतरदेशीय पर्यंटन थंडावले आहे. ही परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी काही प्रमाणात लॉकडाऊन हटवण्यात आला असून अनेक ठिकाणचे हॉटेल्स उघडण्यात आले आहेत. मात्र, हॉटेल उघडूनही ग्राहकांचा पत्ता नसून  महिनभरात केवळ 10 टक्के ग्राहकांची नोंद करण्यात आली आहे. 

राज्य सरकारने हॉटेल आणि इतर संस्थांना कोविड 19 प्रतिबंध झोनबाहेरील गेस्ट हाऊस आणि लॉजसह अन्य सुविधा देणाऱ्या हॉटेल आणि इतर संस्थांना 8 जुलैपासून 33 टक्के व्यापारासह पुन्हा कामकाज सुरू करण्याची परवानगी दिली होती. राज्य सरकारने हॉटेलांना ‘मिशन बिगिन अगेन’ चा भाग म्हणून पुन्हा उघडण्यासाठी महिनाभरापूर्वी परवानगी दिली असूनही त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याची खंत व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. 

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरडब्ल्यूआय) चे अध्यक्ष गुरबक्षिश सिंह कोहली यांनी सांगितले की, बहुतांश आस्थापनांपासून 10 टक्के एवढा ही फायदा झालेला नाही. हॉटेल्स पूर्णपणे बंद झाल्यावर 3 ते 4 महिने त्यांचे मोठे नुकसान झाले म्हणून ते पुन्हा उघडण्यासाठी बहुतेकांनी तयारी दर्शवली. परंतु, हॉटेल सुरु ठेवणेही आता महागडे ठरले आहे. कारण, सर्व सुविधा देण्यासाठी खर्च करावा लागतो. पर्यटन उद्योगाचा वेग वाढत तोपर्यंत हॉटेलमध्ये काम करणार्‍यांच्या रोजगारासह संबंधित घटकांना ट्रॅकवर आणता येणार नाही.

हॉटेलांना पुन्हा कामकाज सुरू करताना राज्य सरकारने काही नियमावली दिली आहे. लॉबी किंवा लिफ्टसारख्या भागात जास्त गर्दी होऊ नये, म्हणून मालकांनी योग्य ती उपाययोजना राबवावी. शिवाय, डिजिटल चेक-इन आणि मेनू कार्डचा समावेश करावा. जिम, जलतरण तलाव आणि गेमिंग क्षेत्राच्या वापरावरही बंदी असून हॉटेल मालकांनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, ही सर्व परिस्थिती पूर्वीपेक्षा बिकट झाली आहे. ग्राहक नाहीत, आंतरराष्ट्रीय प्रवास नसल्यामुळे किंवा आवश्यकतेशिवाय स्थानिक स्वदेशी यात्रा करणे टाळणे, बहुतेक हॉटेल्समध्ये खोल्यांसाठी रहिवासी शोधणे कठीण जात आहे. कॉर्पोरेट्स कडून किंवा लग्नासाठीही बुकिंग झालेली नाही. या सर्वाचा मोठा फटका हॉटेल व्यवसायांना बसला आहे. 

इंडियन हॉटेल अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनचे (एएएचएआर) अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणाले की, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील काही हॉटेल्समध्ये काही ग्राहक येत आहेत. पण, त्यांचा खर्चही खुप आहे. जोपर्यंत देशांतर्गत पर्यटन पुन्हा सुरु होत नाहीत, तोपर्यंत ही परिस्थिती कायम राहील. त्यामुळे, सरकारने देशांतर्गत हॉटेल्स पुर्णपणे खुले करण्याची परवानगी दिली पाहिजे. जेणेकरुन हा व्यवसाय वाढवणे सोपे होईल. आणि त्याचा फायदा होईल. सध्या 10 टक्के ही व्यवसाय होत नाही. लोक सुट्टी साठी कुठे तरी जातील त्यामुळे, किमान सरकारला थोडया प्रमाणात प्रमोट करावे लागणार आहे. तोपर्यंत देशांतर्गत हॉटेल खुली केली गेली पाहिजे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com