गटारी भाज्यांच्‍या शेतीवर कारवाईचा नांगर!

file photo
file photo

ठाणे : रेल्वेच्या बहुतांश स्थानकांलगत पिकणाऱ्या पालेभाज्या या गटारातील सांडपाण्यावर पिकविण्यात येतात. या भाज्या किरकोळ विक्रेते आणि हॉटेलचालकांकडे विकण्यासाठी येतात. गटारातील सांडपाण्यातील रासायनिक पदार्थांमुळे या भाज्या आरोग्याला हानिकारक असून, भाजी पिकवताना गटाराचे पाणी वापरताना आढळल्यास तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी सहाय्यक आयुक्‍तांना दिले आहेत. या पालेभाज्यांचा दर्जा तपासण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले आहेत.

रेल्वे रुळांलगत; तसेच ठाणे शहरातील विविध ठिकाणी भाजीचे मळे असून या भाजीपाल्यांसाठी सांडपाणीमिश्रित अस्वच्छ पाणी वापरले जात असल्याच्या तक्रारी अनेक वर्षांपासून येत आहेत. या तक्रारींमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी महापौर नरेश म्हस्के यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्या उपस्थितीत सर्व सहाय्यक आयुक्त व विविध विभागांची तातडीची बैठक घेतली.

दूषित पाणी वापरून भाज्यांची लागवड ठाणे शहरात ज्या ज्या ठिकाणी होत आहे, त्याची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश महापौरांनी दिले आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ठाणे महापालिकेचे पहिले कर्तव्य असून याबाबत तातडीने कारवाई करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या आहेत. तसेच याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही तक्रार केली असल्याचे महापौरांनी बैठकीत सांगितले.

याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असून याची कसून चौकशी करण्याचे आदेश महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाला; तसेच प्रत्येक प्रभाग समितीनिहाय असलेल्या सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. अशा प्रकारे गलिच्छ ठिकाणी पिकविलेल्या भाज्यांची लागवड जे करीत असतील, त्यांच्यावर कठोर पावले उचलून तातडीने कारवाई करण्याचे संकेतही महापौरांनी दिले आहेत. 

मलमूत्रमिश्रित, गटारातील पाण्याचा वापर 
रेल्वे ट्रॅकजवळच्या मोकळ्या जागेत; तसेच शहराच्या बहुतांश ठिकाणी भाजीचे मळे आहेत. या ठिकाणी बोअरवेल असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मात्र पिकांसाठी मलमूत्रमिश्रित सांडपाणी; तसेच गटाराचे पाणी वापरण्यात येते. मानवी मलमूत्र हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे, असे असताना देखील याच सांडपाण्यावर अशा प्रकारे भाजीपाला पिकवून एक प्रकारे विविध रोग नागरिकांना दानस्वरूपात दिले जात आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही, असे महापौरांनी म्हटले. 


नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेचे पहिले कर्तव्य आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या व अशा बेफिकीरपणे भाजी विकणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत महापालिकेने कोणतीही कसूर करू नये. 
- नरेश म्हस्के, महापौर, ठाणे 

होणारे आजार 
कर्करोग 
पोटाचे विकार 
मेंदूचे विकार 

अधिकाऱ्यांनो, या ठिकाणी करा कारवाई
 कळवा
 मुंब्रा
 दिवा
 समतानगर
 गांधीनगर
 सिडको
 मफतलाल कंपाऊंड
 भिवंडी बायपास,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com