गुड न्यूज...कसारा रेल्वे मार्गावरील महत्त्वाचा अडथळा जुलैमध्ये होणार दूर

रेल्वे उड्डाण पुलावरील रस्त्याचे युद्धपातळीवर सुरू असलेले काम
रेल्वे उड्डाण पुलावरील रस्त्याचे युद्धपातळीवर सुरू असलेले काम

कल्याण : मध्य रेल्वेच्या शहाड-आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या वडवली फाटक येथे उड्डाण पुलाचे काम रखडले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून रेल्वे वाहतुकीवरही परिणाम होत आहे. या उड्डाणपुलाचे काम कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून युद्धपातळीवर सुरू असून जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल, अशी माहिती कल्याण-डोंबिवली महापालिकेचे कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांनी दिली. 

वडवली फाटकामधून कल्याणच्या ग्रामीण भागातील नागरिक प्रवास करतात. अनेक वेळा वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम होतो. याच पार्श्‍वभूमीवर 2011 मध्ये येथील उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

या पुलाची लांबी 840, रुंदी 9 मीटर; तर रेल्वे रुळावरून 94 मीटर पुलाचा भाग येतो. रेल्वेच्या हद्दीत पुलाचे काम पूर्ण झाले; मात्र पुलाच्या आजूबाजूची जमीन पालिकेकडे न आल्याने हे काम रखडले होते. गेल्या 10 वर्षांत या रस्त्यावरून वाहनांची वर्दळ वाढल्याने वडवली फाटक अनेकदा जास्त वेळ उघडे ठेवल्याने रेल्वे वाहतूक खोळंबण्याचे प्रकार वाढील लागले. 

त्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून केडीएमसीवर पुलाच्या बांधकामासाठी दबाव वाढला. अखेर पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी अधिकारी वर्ग आणि ठेकेदारांची बैठक घेऊन कामाला गती देण्याचे आदेश दिले. त्यानुसार कल्याण-मोहना रोडवरील पुलाचे गर्डर टाकण्यासाठी 22 ऑक्‍टोबर 2019 रोजी मध्यरात्री 12 ते दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12 या कालावधीत वडवली रेल्वे फाटक बंद ठेवण्यात आले होते.

त्या वेळी हा पूल मार्चअखेरीस खुला करण्यात येईल, असा दावा पालिकेने केला होता; मात्र वळण रस्त्याच्या पेचामुळे हा दावा फोल ठरणार आहे. आता पालिकेने पुन्हा येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुलाचे काम पूर्ण होणार असल्याचा दावा केला आहे. त्याप्रमाणे हा दावा यशस्वी ठरतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावर अनेक फाटक असून ते एक-एक बंद करत आहोत. वडवली उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. हा पूल सुरू झाल्यास कल्याण-कसारा रेल्वे मार्गावरील प्रवास गतिमान करता येईल. 
- शिवाजी सुतार, 
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

राज्य सरकार आणि स्थानिक पालिका प्रशासन रेल्वेला मदत करत नसल्याची अनेक उदाहरणे आहेत. वडवली उड्डाणपूल त्याचेच उदाहरण असून, या पुलाचे काम पूर्ण न झाल्याने प्रवासी वर्गाला मनस्ताप सहन करावा लागत आहे. पालिकेने या पुलाचे काम अधिक गतीने करावे. 
- श्‍याम उबाळे, सचिव 
के 3 रेल्वे प्रसावी संघटना 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com